Home » राज्य » प्रशासकीय » नागेवाडी लिंब पोलीस मदत केंद्र दहा वर्षापासून कुलूप बंद

नागेवाडी लिंब पोलीस मदत केंद्र दहा वर्षापासून कुलूप बंद

नागेवाडी लिंब पोलीस मदत केंद्र दहा वर्षापासून कुलूप बंद

जिल्हा पोलीस दलाचे दुर्लक्ष….पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे.. महामार्गावरील सुरक्षितता धोक्यात.. लुटमारीचे प्रमाण वाढले..

लिंब – सातारा तालुका पोलीस स्टेशन अंकित पोलीस मदत केंद्राचे 19 जून 2015 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते नागेवाडी लिंब येथे या केंद्राचे उद्घाटन झाले होते गेली दहा वर्षापासून हे मदत केंद्र बंद असून सध्या या मदत केंद्राची दयनीय स्थिती झाली आहे.

येथील लोखंडी दरवाज्याला गंज पकडला असून परिसरात वाढलेली झाडे झुडपे व वेली यांचा विळखा या मदत केंद्राला पडल्याचे दिसून येत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व महामार्गावरील रस्ते अपघातातील नागरिकांना तातडीने मदतीचा हात देण्यासाठी उभारलेले हे पोलीस मदत केंद्र दहा वर्षापासून कुलूप बंद असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या मदत केंद्राची नागरिकांना कोणतीच मदत होत नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.सातारा पुणे महामार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या पोलीस मदत केंद्राची तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा असा सूर नागरिकांमधून उमटत आहे याबाबत श्रीरंग काटेकर यांनी घेतलेला एक आढावा.

सातारा पुणे महामार्गावरील वाढेफाटा ते आनेवाडी टोल नाका दरम्यान घडणारे रस्ते अपघातामधील अपघात ग्रस्तताना तातडीने मदत होण्यासाठी व या मार्गावरील प्रवाशांची होणारी लूट मारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने 19 जून 2015 रोजी नागेवाडी लिंब येथे पोलीस मदत केंद्र उभारले होते गेली दहा वर्ष हे मदत केंद्र बंद अवस्थेत असून उद्घाटनानंतरच्या काळात या मदत केंद्राला लागलेले कुलूप अद्याप उघडलेले नाही हे मदत केंद्र केवळ नावापुरतेच उभारले का असा प्रश्न आता परिसरातील नागरिकांमधून उमटू लागला आहे सातारच्या पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे वास्तविक सातारा पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची व प्रवाशांची ये जा मोठ्या प्रमाणात सुरू असते अशा ठिकाणी संबंधित यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे या ठिकाणी पोलीस मदत केंद्र दिवस रात्र सुरू ठेवणे अपेक्षित असताना हे मदत केंद्र कुलूप बंद पाहिला मिळत आहे सध्या या परिसरात उद्योग व्यवसाय व शैक्षणिक संस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून या भागात आयटी पार्क उभारण्याची चर्चा सर्वत्र रंगू लागले आहे पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर झपाट्याने बदलत आहे नागेवाडी येथील शाकंबरी देवीच्या दर्शनास भाविक मोठ्या संख्येने येत आहेत त्यामुळे येथे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्याचप्रमाणे लिंब येथे प्रसिद्ध असलेले बारा मोटीची ऐतिहासिक विहीर पाहण्यासाठी लाखो पर्यटक येथे येत असतात त्याचप्रमाणे शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर लिंब गावात असल्याने तेथेही भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात त्याचप्रमाणे साहित्यिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणारे कवी बा सी मर्ढेकर यांचे मर्ढे येथे असलेल्या स्मारकाला ही अनेक साहित्यिक देशभरातून भेटी देत असतात त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटक यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची नितांत गरज आहे या परिसरात भाविक पर्यटक व नागरिकांची वाढलेली संख्या पाहता लुटमार करणाऱ्याचेप्रमाण या ठिकाणी वाढलेले आहे लुटमार व चोरा चोरीचे प्रमाण पाहता या ठिकाणी घडलेल्या घटनेची नोंद करण्यासाठी अनेकांना सातारा तालुका पोलीस स्टेशन मध्ये नोंद करावे लागते वास्तविक येथे घडलेल्या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस स्टेशन मध्ये जाऊन करणे नागरिकांना सोयीचे नसल्याने चोरीच्या व अपघाताच्या घटना घडल्या तरी त्याची नोंद पोलीस स्टेशनला होत नाही.

– लिंबखिंड ते आनेवाडी टोल नाका सेवा रस्त्यावरून रात्री अप रात्री प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना विशेषता टू व्हीलर अडवून या ठिकाणी लुटले जाते या मार्गावर वारंवार या घटना घडत असतात चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने या मार्गावरून रात्री अपरात्री प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे नागरिकांच्या व वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी पोलीस मदत केंद्र खूप गरजेचे आहे.

नागेवाडी लिंब कुशी मर्ढे चतुर बेट कोंढवली विठ्ठलवाडी रायगाव ढगेवाडी साळवण गोवे या गावागावातील वादावादीच्या घटना मिटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागेवाडी लिंब येथील पोलीस मदत केंद्र बंद असल्याने या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते दाद मागण्यासाठी सातारा तालुका पोलीस स्टेशनला नाहक हेलपाटे मारावे लागतात शेतीची कामे अर्धवट सोडून व व्यवसाय बंद ठेवून दिवस दिवस पोलीस चौकीच्या दारात बसून राहावे लागते नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांना न्याय मिळावा यासाठी नागेवाडी लिंब पोलीस मदत केंद्राची उभारणी केली असताना हा त्रास नागरिकांनी का सहन करावा याबाबत या परिसरात उलट सुलट चर्चा होत असतात.

 – सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या लिंब नागेवाडी रायगाव सायगाव मर्ढे ही गावे नेहमीच चर्चेत असतात या ठिकाणी राजकीय मंडळींचा सतत वावर असल्याने व विविध पक्षांचे गट तटाचे राजकारण असल्याने या परिसरात अनेकदा तणावाचे वातावरण होत असते त्यामुळे या ठिकाणी वादविवादाचे प्रमाण हे अधिक आहे अनेकदा वादाचे रूपांतर मारामारीत व जीव घेणे हल्ल्यामध्ये होत असते काही वर्षांपूर्वी लिंब येथे एका नेत्यावर जीव घेणे हल्ला झाला होता राजकीय संघर्ष व निवडणुकीतील घडलेल्या घटनेची याला किनार असते त्यामुळे या भागात पोलीस मदत केंद्र कार्यरत असणे हे अत्यंत गरजेचे आहे.

– सातारा पोलीस दलाचे आधुनिकीकरण करून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा राज्य सरकारने पोलीस दलास देणे आवश्यक आहे सातारा तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या खूपच अपुरी आहे ती वाढवणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पोलीस चौकींना सुसज्ज बनवणे ही गरजेचे आहे पोलीस दलात वाहनांची अपुरी संख्या यामुळे अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर बंधन येतात ती दूर करण्यासाठी वाहनांची संख्या वाढवणे आवश्यक आहे सातारचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी याबाबत पुढाकार घेऊन पोलीस दलाला असलेल्या अडचणी तातडीने निवारण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी लोकभावना आहे त्याचप्रमाणे नागेवाडी ते आनेवाडी टोल नाका दरम्यानची पोलीस वाहन ग्रस्त वाहन गेल्या आठ वर्षापासून बंद आहे त्यामुळे रस्त्यावरील घडणाऱ्या अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळत नाही तसेच लुटमार करणाऱ्यांचा महामार्गावर सुळसुळाट झाला आहे.

श्रीरंग काटेकर सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

भारताने गमावला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खगोलशास्त्रज्ञ, डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

Post Views: 33 भारताने गमावला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खगोलशास्त्रज्ञ, डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे

Live Cricket