“पडद्यामागून वार, समोर विकासाला विरोध!”१५ वर्ष सत्ता उपभोगूनही हस्तांतरण नाही; आता स.स. ९१ वरून राजकारण — नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांचा जहाल पलटवार
महाबळेश्वर ( प्रतिनिधी)महाबळेश्वरातील स.स. ९१ (वुडसाईड मिल्क प्रॉडक्ट) मालमत्तेच्या मुद्द्यावरून पडद्यामागून विरोध करत शहराच्या विकासात अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केला आहे. “१५ वर्ष सत्ता उपभोगताना हस्तांतरण करता आले नाही, आणि आता स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी विकासाला विरोध केला जात आहे,” असा जहाल हल्लाबोल त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.
नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी स्पष्ट केले की, संबंधित मालमत्ता वारसा स्वरूपाची असून ती पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येते. त्यामुळे कोणतीही प्रक्रिया ही शासन, पर्यावरण विभाग, वन विभाग आणि इतर सक्षम प्राधिकरणांच्या मंजुरीनंतरच होऊ शकते. “ही केवळ नगरपालिकेच्या एका सहीने होणारी प्रक्रिया नाही. कायदेशीर अटी, पर्यावरणीय नियम आणि न्यायालयीन बाबींची पूर्तता करावी लागते,” असे त्यांनी म्हटले.
“नगरपालिकेच्या नावावर नाही म्हणजे गैरव्यवहार” असा प्रचार दिशाभूल करणारा असल्याचे सांगत नगराध्यक्ष सुनिल शिंदे म्हणाले की, “जनतेमध्ये संशय निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. जे स्वतः अनेक वर्षे सत्तेत होते त्यांनी त्या काळात नेमके काय केले, हा प्रश्न जनतेला पडला आहे.”
त्यांनी विरोधकांवर थेट टीका करत म्हटले की, “पडद्यामागून वार करणाऱ्यांनी आधी शहरासाठी किती निधी आणला, किती विकासकामे केली आणि किती प्रश्न सोडवले याचा हिशेब द्यावा. समाजमाध्यमांवर आणि निवडक बातम्यांतून वातावरण खराब करणे सोपे असते, पण प्रत्यक्ष काम करण्यासाठी इच्छाशक्ती लागते.”
स.स. ९१ प्रकरणावरून “उच्चस्तरीय चौकशी” ची मागणी करणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. “कोणतेही अधिकृत पुरावे नसताना प्रत्येक प्रक्रियेला भ्रष्टाचाराचा रंग देणे म्हणजे राजकीय दिखावा आहे. विकास रोखण्यासाठी मुद्दाम संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
महाबळेश्वरच्या संवेदनशील पर्यावरणाचा विचार करूनच प्रशासन सावध भूमिका घेत असल्याचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी सांगितले. “वारसा, पर्यावरण आणि पर्यटन यांचा समतोल राखणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. नियमांचे पालन केले तर आरोप, आणि नियम मोडले तर न्यायालय — विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे,” असे ते म्हणाले.
“महाबळेश्वरचा विकास थांबवण्याचा कोणाचाही डाव यशस्वी होणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. “काही लोकांना शहराचा विकास नको, तर सतत वाद आणि संशयाचे राजकारण हवे आहे. मात्र जनता आता सर्व पाहत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, स.स. ९१ प्रकरणामुळे महाबळेश्वरमध्ये राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




