Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » राज्यपाल यांच्या हस्ते ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ या राष्ट्रीय स्तरावरील ‘विजेता पुरस्कार’ यशोदा टेक्निकल कॅम्पस ला प्रदान

राज्यपाल यांच्या हस्ते ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ या राष्ट्रीय स्तरावरील ‘विजेता पुरस्कार’ यशोदा टेक्निकल कॅम्पस ला प्रदान

राज्यपाल यांच्या हस्ते ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ या राष्ट्रीय स्तरावरील ‘विजेता पुरस्कार’ यशोदा टेक्निकल कॅम्पस ला प्रदान

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ या राष्ट्रीय स्तरावरील ‘विजेता पुरस्कार’ यशोदा टेक्निकल कॅम्पस ला प्रदान करण्यात आला. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उप महानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हील टेक्नॉलॉजीस लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. 

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन आणि क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट क्लब विजेता पुरस्कार यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा अभियांत्रिकी विद्याशाखा, राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा.चव्हाण विकास ज्ञानू, सर्वोत्कृष्ट क्लब अध्यक्ष उपविजेता पुरस्कार श्री.किरण सानप प्रदान करण्यात आलl. 

स्वामी विवेकानंदांना जयंतीनिमित्त अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, स्वामी विवेकानंदांची शिकवण लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना, धैर्याने, शहाणपणाने आणि उद्देशाने नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देत आहे. त्यामुळे क्विक हील फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा पुरस्कारांमध्ये युवकांसोबत सामील होताना आनंद होत आहे.

२०१६ पासून हा कार्यक्रम सुरू करून आतापर्यंत ५४ लाख लोकांपर्यंत सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता केल्याबद्दल फाउंडेशन आणि क्विक हील टेक्नॉलॉजीसचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, फाउंडेशनने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर आणि सायबर-सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या फाउंडेशन बरोबर जोडले जाऊन तळागाळापर्यंत काम केलेले सर्व ‘सायबर वॉरियर्स’ कौतुकास पात्र आहेत.

ते पुढे म्हणाले, सायबर सुरक्षा ही भारतासह जगभरातील सर्वात गंभीर चिंतांपैकी एक म्हणून उदयास आली आहे, आज आपण पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहोत. अगदी अशिक्षित छोटा विक्रेता देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतो. हे प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तंत्रज्ञानाचे यश आहे.

तंत्रज्ञान पुढे जात असताना चुकीचे काम करणारे लोकदेखील वाढत आहेत. तथापि, त्यांची साखळी तोडणे आणि त्यांना पकडण्याचे कामदेखील आपल्याला करावे लागणार आहे. आज सायबर गुन्हेगारीत स्थिर गतीने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सायबर गुन्हेगारीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक त्याचा पैसा गमावणार नाही अशी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. नुकसानीनंतर उपाययोजना करण्यापेक्षा नुकसानीला प्रतिबंध करण्याच्या आवश्यकतेवर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी भर दिला.

शासनाच्या सायबर शाखेतील पोलीसांनाही अशा फाउंडेशनद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कसे काम करता येईल यासाठी संगणक यंत्रणेचे पुरेसे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा इतर देशातून काम करत असल्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यामध्ये नवीन कायदे करण्यासह असलेली धोरणे अधिक मजबूत करणे, सायबरसुरक्षेत अधिक गुंतवणूक करणे, यासह जागरूकता पसरवण्यावर अर्थात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धतींबद्दल शिक्षित करणे यावर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

अनुपमा काटकर म्हणाल्या, सायबर शिक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम करणे, आणि सर्वांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी त्यांना पुढे आणण्यासाठी राबविला आहे. हा उपक्रम केवळ सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठीच नसून छोट्या शहरातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना एक आवाज देण्याचा, तेथील समाजघटकामध्ये या क्षेत्रात त्यांचे नेतृत्त्व तयार करण्याचा उपक्रम आहे. 

विजेता पुरस्कार विद्यार्थी व शिक्षक यांचा संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, प्राचार्य डॉ विक्रम पाटील, डायरेक्टर डॉ विवेक रेदासानी, असोसिएट डायरेक्टर प्रा आर डी मोहिते, रजिस्ट्रार गणेश सूरवसे, संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ सरिता बलशेट्वर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा ला या कार्यक्रमादरम्यान तीन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.सर्वोत्कृष्ट क्लब विजेता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट क्लब अध्यक्ष उपविजेता पुरस्कार या पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 14 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket