सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना
मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक
सातारा प्रतिनिधी -अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध उपाययोजना राबविणे सुरू.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानव–वन्यजीव संघर्ष वाढत असून, विंचवाचे चावे, सर्पदंश तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालीमुळे विविध घटना समोर येत आहेत.
मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.सातारा वनपरिक्षेत्रातील रोहोट परिमंडळांतर्गत रोहोट , खडगाव, धावली या बिट मधील गावांमध्ये वनविभागाकडून ग्रामस्थांच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. बैठकांद्वारे ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान किंवा पशुधन हानी झाल्यास तात्काळ पंचनामा करून मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.रोहोट परिसरातील वनक्षेत्रात बिबटे, तरस, रानडुकरांची संख्या वाढलेली असून संघर्षाच्या घटना नोंदविल्या जात आहेत.
परळी खोरे दाट जंगलामुळे जोडलेले असल्याने येथे वन्यजीवांची वावर वाढलेली आहे. वनपाल राजाराम काशिद गावोगावी भेट देऊन जनजागृती करत आहेत.मुलांना रात्री एकटे रस्त्यावर न पाठवणे, शेतीकाम करताना सावध राहणे याबाबत सूचना करण्यात येत आहेत.
“मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठकांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे,”
वनपाल राजाराम काशिद
विविध शासकीय योजनांबद्दलही मार्गदर्शन देण्यात आले. विंचवाच्या दंशावर तात्काळ प्राथमिक उपचार कसे करावेत, याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.वनरक्षक, वनपाल मिळून येत्या काळात संघर्ष कमी करण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.



