वाई तालुक्यातील जांभळी तलाव १००% भरला
सातारा -वाई तालुक्यातील जांभळी लघु पाटबंधारे तलाव १०० टक्के भरला असून सध्या सांडव्यावरून ५०२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणतीही घबराट न बाळगता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जांभळी लघु पाटबंधारे तलावातून सोडण्यात येणारे पाणी थेट धोम धरणाच्या जलाशयात जात असल्याने या विसर्गामुळे सध्या किंवा भविष्यातही कोणत्याही गावाला पूर अथवा इतर प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने तलावातील पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.





