कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी ५ वाजता उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सातारा -कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, गुरुवार (दि. ३० जुलै २०२६) रोजी सायंकाळी ५.०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी १ फूटाने उघडण्यात येणार असून, त्याद्वारे ५,०७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे.
सध्या कोयना पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्यामधून १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत एकूण ६,१२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.
दरम्यान, पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या आवकनुसार सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरणातून पाणी सोडल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी केले आहे.





