खड्ड्यांचा खेळ थांबवा आणि ‘प्युअर डांबराचे’ रस्ते करा; महाबळेश्वरच्या सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
महाबळेश्वर: (प्रतिनिधी)स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतरही सर्वसामान्य जनतेला चांगल्या रस्त्यांसाठी आंदोलने करावी लागणे, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. रस्त्यांच्या कामात होणारी सरकारी पैशांची उधळपट्टी आणि निकृष्ट दर्जाचा ‘शिवतापाणी’ खेळ थांबवण्यासाठी आता सर्व सार्वजनिक रस्ते ‘प्युअर डांबरात’ करणे काळाची गरज आहे, अशी आग्रही मागणी महाबळेश्वरचे सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ता श्री. सूर्यकांत बाळासो पांचाळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ऑईल मिश्रित डांबराचा कंत्राटदारांना फायदा?
श्री. पांचाळ यांनी आपल्या निवेदनात रस्त्यांच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, प्युअर डांबर वापरून केलेले रस्ते अत्यंत टिकाऊ आणि दर्जेदार होतात. अशा रस्त्यांना अनेक वर्षे साधी किरकोळ डागडुजीही लागत नाही. मात्र, रस्ते जास्त काळ टिकले तर कंत्राटदारांना नवीन कामे मिळत नाहीत. परिणामी, जाणीवपूर्वक ऑईल मिश्रित डांबर वापरून रस्ते केले जातात, जे वर्ष-दोन वर्षांतच उखडतात. यामुळे पुन्हा निविदा (टेंडर) निघतात आणि सरकारी तिजोरीवर नाहक भार पडतो.
सिमेंट काँक्रीट रस्त्यांबाबतही साशंकता
केवळ डांबरीच नव्हे, तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काँक्रीटच्या रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडणे, खडी उखडणे आणि सळ्या बाहेर येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा रस्त्यांचे ‘पॅचवर्क’ नीट होत नसल्याने अनेक ठिकाणी भीषण अपघात घडत आहेत. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
‘चारो उंगलीया घी मे…’ अशी अवस्था
रस्त्यांच्या या चक्रावर टीका करताना पांचाळ म्हणाले की, “प्रथम निकृष्ट रस्ता करायचा, मग तो खराब झाला की जनतेने आंदोलने करायची, त्यानंतर पुन्हा दुरुस्तीचे टेंडर काढायचे, हा खेळ वारंवार सुरू आहे. यामध्ये वरपासून खालपर्यंत सर्वांचेच उखळ पांढरे होत असून, ‘चारो उंगलीया घी मे और सर कढायी में’ अशी काहींची अवस्था झाली आहे.”
सरकारला नम्र विनंती
महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळासह संपूर्ण महाराष्ट्रात दळणवळणाची समस्या गंभीर होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी:शासन स्तरावर सर्व रस्ते ‘प्युअर डांबरात’ करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा.कामाच्या दर्जावर वरिष्ठ अधिकार्यांनी कडक नियंत्रण ठेवावे.जनतेचे हाल थांबवून सरकारी पैशांचा अपव्यय थांबवावा.अशी मागणी श्री. सूर्यकांत पांचाळ यांनी केली आहे. आता शासन या निवेदनाची दखल घेऊन रस्त्यांच्या कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




