प्रतापगडची श्री भवानीमाता
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून साधारणपणे २१ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. याच प्रतापगडावरचं तुळजाभवानीचं मंदिरही खुद्द शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली बांधले गेले असून आजही प्रतापगडावर शिवकालीन रितीप्रमाणे दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो.
महाबळेवरच्या जटात व पारघाटाच्या ओठात असणाऱ्या प्रतापगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५५६ फूट आहे. सन १६५८ च्या सुमारास या किल्ल्याची निर्मिती मोरोपंत यांच्या मार्गदर्शनाखाल दोन वर्षात पूर्ण करण्यात आली. कोकण व वाई प्रांत यांना जोडणा-या वाटेवरील या डोंगराच्या भौगोलिक स्थानाचे महत्त्व शिवछत्रपतींनी हेरले होते. याच प्रतापगडाच्या भौगोलिक सामर्थ्यांचा उपयोग करून शिवछत्रपतींनी अफजलखानाचा वध केला.
अफजलखान वधाने शिवछत्रपतींची प्रतिमा एक शूर धाडसी व युद्धनिपुण सेनापती अशी सगळीकडे झाली. सन १६५९ ते १८१८ या प्रदीर्घ कालखंडात सन १६८९मधील काही महिन्यांचा कालावधी सोडल्यास प्रतापगड शत्रूच्या ताब्यात कधीच नव्हता.
प्रतापगडावर श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी मंबाजी नाईक पानसरे यांनी हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात जाऊन त्यांच्या सहाय्याने हिमालयातील त्रीशुलगन्डकी, श्वेतगंडकी व सरस्वती या नद्यांच्या संगमातून शाळीग्रामाची उत्तम शिला मिळवली. मूर्ती घडवण्यासाठी कुशल शिल्पकारांकडून परिश्रमपूर्वक श्री तुळजाभवानीमातेच्या मूर्तीच्या मूळ प्रतिकृतीबरहुकूम अप्रतिम मूर्ती घडविली.
साधारण दोन फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीच्या मस्तकावरील मुकुटावर शिवलिंग असून ही भवानी माता अष्टभुजा महिषासुरमर्दिनी स्वरूपात आहे. देवीच्या आठही हातांत शस्त्रे आहेत. डाव्या व उजव्या बाजूस सूर्य-चंद्र झळकत आहेत. अशी ही अतिशय प्रसन्नवदन मूर्ती प्रथम राजगडावर आणण्यात आली. शिवाजी महाराजांनी तिचे दर्शन घेतल्यानंतर प्रतापगडावर मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर मूर्ती प्रतापगडी पाठवण्यात आली. शिवरायांच्या आज्ञेवरून जुलै १६६१ रोजी मोरोपंतांच्या हस्ते समारंभपूर्वक देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवाजी महाराजांनी देवीस नाना प्रकारचे रत्नजडित अलंकार, भूषणे वगैरे करून दिली, उदंड दानधर्म केला.
गडावरील भवानीमातेची अष्टभूजा महिषासुरमíदनीची सिंहारूढ मूर्ती लक्षवेधक आहे. देवीचा गाभारा लहानसा असून येथील शिल्पकाम लाकडीच आहे. देवीच्या खर्चासाठी म्हणून पंधरा गावांचे उपन्न लावून दिल्याची नोंद आहे. याच देवीने छत्रपती शिवरायांना भवानी तलवारीचा प्रसाद दिला अशी कथा जनमानसात रूढ आहे.परमानंद कवीच्या संस्कृत शिवभारतात ‘भवानी तलवार’ हे नाव का पडले याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. प्रतापगड येथील मूर्तीसंबंधी चिटणीस बखरीत पुढील उल्लेख मिळतो ‘पर्वताचा राजा लीलासेन याचे राज्यापावेतो जाऊन त्रिशूळगंडकी व श्वेतगंडकी आणि सरस्वती संगमी शिळेचा शोध करून उत्तम शिळा प्राप्त झाली. सिलपी प्रांतीचे हुनरवंद आणून मूर्ती सिद्ध केली आणि मोरोपंत प्रधान यास मागमे पाठवून प्रतिष्ठा केली.
शिवकाळात नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडे मंबाजी नाईक पानसरे यांना पाठवून श्वेतगंडकी त्रिशूलगंडकी व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरील उकृष्ट शिळा मिळवून गडावरील सध्या असणारी भवानी घडवली गेली, असाही संदर्भ मिळतो. नवरात्र आणि विजयादशमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शक्तिस्थानांविषयी बोलले जाते. प्रतापगडावरील तुळजाभवानीचे याबाबतीत खूप महत्व आहे. कागदपत्रे तपासताना महाराजांनी देवीच्या पूजेअर्चेसाठी दूरवर विचार करून वेगळं संस्थानच तयार केल्याचं दिसतं. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराजांनी त्यात भर घातल्याचं आढळते. पेशवाईत सरखेल कान्होजी आंग्रेंनी प्रतापगडाच्या तुळजाभवानी संस्थानाला देणग्या दिल्याची कागदपत्रे आहेत.
विजापुराहून निघाल्यानंतर अफझलखानाने मराठ्यांची आराध्य देवता असलेल्या तुळजापूरच्या भवानीची मूर्ती आणि मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण १० नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवरायांनी अफझलखानाचा वध केला आणि त्यानंतर त्याच प्रतापगडावर तुळजाभवानीची प्रतिष्ठापना करून योग्य न्याय केला तेच हे तुळजाभवानीचे मंदिर होय.
महाराजांनी श्री भवानी देवीच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र संस्थानच स्थापून दिले. श्री भवानी मातेची पूजाअर्चा, उत्सव, इत्यादीबद्दलची पद्धत घालून दिली. महाल, मोकासे, सनदा देऊन देवीच्या संस्थानाच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हवालदार, मुजुमदार, पेशवे, फडणीस, पुजारी, सेवेकरी, वगैरे नेमणुका वंशपरंपरेने करून दिल्या.
महाराज स्वत:ला देवीचे भोपे म्हणजे पुजारी म्हणवत. या भोपेपणाची मुतालिकी म्हणजे प्रतिनिधित्व मंबाजी नाईक पानसरे यांना देण्यात आली. देवीच्या नित्य पूजेसाठी वेदशास्त्र संपन्न विश्वनाथभट हडप यांची नेमणूक करण्यात आली.महाराजांनी ८००० होनाचे वार्षिक उत्पन्न या संस्थानासाठी करून दिले. देवीच्या खर्चासाठी १५ गावांचा महसूल नेमून देण्यात आला. त्याचप्रमाणे पार घाटातून येणाऱ्या व जाणाऱ्या मालावरील जकातीपैकी दर बैलास एक रुका देवीला उत्पन्न म्हणून मिळू लागला. गडावरील देवळात दररोज त्रिकाळ चौघडा, पूजा, नैवेद्य, पुराण, पाठ, गोंधळ सुरू झाले. नवरात्राचा उत्सव थाटामाटात साजरा होऊ लागला.
शिवकाळापासून पूजा उत्सवासाठी नियमावली करून देवीचा व्यवस्थापक म्हणजे, हवालदार नेमण्यात आला. देवीची नित्यपूजा, सुर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर चौघडावादन, देवीची पंचामृतपूजा, अभ्यंगस्नान, स्नानाचे वेळेस आरती केली जात होती. मंदिरासमोर प्रतिदिनी सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर तसेच प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक प्रहरीचे आरंभी चौघडा वाजविला जाई. दररोज देवीची पंचामृत पूजा होत असे. अभंगस्नानास सुवासिक तेल व उष्णोदक असे. स्नानाचे वेळेस आरती होई व त्यावेळी वाजंत्री वाजविली जात. प्रतिदिनी सायंकाळी देवीला मुजरा करण्यासाठी मशालजी, शिंगाडे यांच्यासह गडावर असलेले सर्व स्थानिक लोक व मानकरी उपस्थित असत. रात्रीच्या वेळेस देवीस पूजक मुखवस्त्र घालीत. शेजारीच असलेल्या पलंगावर देवीच्या पादुका ठेवल्या जात. देवीला झोपविले जाई.
भल्या पहाटे हवालदार देवीचे मुखवस्त्र काढून देवीला जागे करीत. प्रत्येक पौर्णिमेस उत्सव असे. त्यावेळी देवीचा गोंधळ केला जाई. पालखीत देवीच्या पादुका ठेवून मंदिराभोवती शिंगे, कर्णे, संबळ वगैरे वाद्यांच्या गजरात पालखीच्या पाच प्रदक्षिणा होत. पालखीच्या भोयांचे पायांवर दूध व पाणी घातले जाई. तेच देवाचे पाय असे समजत. कोजागिरीला दुग्धपान असे. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री देवळासमोरील दीपमाला प्रज्वलित केल्या जात.
नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होई. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत दहा दिवस उत्सव असे. नवरात्रात घटस्थापना, होमहवन, शतचंडी, त्रिकाल पूजा, नैवेद्य, गोंधळ, कीर्तन, पुराण होत असे. विजयादशमीची पालखीची मिरवणूक पालखीच्या माळापर्यंत, म्हणजे अफझलखानाच्या कबरीपर्यंत नेत. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीचा रंग लालभडक व उंची एक हात चार बोटे हे ठरलेले होते. गोकुळ अष्टमीला दहीहंडी होई. रामनवमीचा उत्सवदेखील साजरा होई. हि परंपरा आजही सुरु आहे.
६ जून १६७४ या सोन्याच्या दिवशी शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. त्यापूर्वी ते १९ मे १६७४ रोजी महाराज प्रतापगडावर श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. महाराजांनी स्वतःच्या मस्तकी छत्र धारण करण्यापूर्वी देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले. या छत्राचे वजन होते सव्वा मण. या छत्राची त्या काळातील किंमत होती ५६००० रुपये. भवानी मातेला राज्याभिषेकाचे आमंत्रण देऊनच महाराज रायगडावर परत आले.
भवानीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी छत्रपतींनी अन्नछत्र सुरू केले. या अन्नछत्रात कोरडा शिधा भाविकांना दिला जात असे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना देण्यासाठी हवालदार पानसरे व पूजक हडप यांच्यामार्फत हा शिधा देण्यात येई. या अन्नछत्राची व्यवस्था कशी असावी, हे महाराजांनी मंबाजी नाईकांना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते.२ जुलै १६८० श्रावण शुद्ध या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक झाला.
संभाजीराजांनीपुढच्याच महिन्यात प्रतापगडच्या भवानीमातेला दरवर्षी दहा हजार होन देणगी दिल्याचे शिक्का मोर्तबाचे पत्र त्यांनी करून दिले.मोगलांनी इ.स.१६८९ साली रायगडानंतर प्रतापगड सर केला. त्यापूर्वी ५ एप्रिल १६८९ रोजी छत्रपती राजाराम रायगडाच्या वेढ्यातून निसटून प्रतापगडावर आले. या वेळी भवानीमातेची मूर्ती मोगलांच्या संसर्गापासून संरक्षित ठेवण्यासाठी गुप्त ठिकाणी हलविण्यात आली. हे ठिकाण पार गावातील रामवरदायिनी मंदिरातील तळघरात असल्याचे सांगण्यात येते. पुढे अवघ्या तेरा महिन्यांतच मराठ्यांनी औरंगजेबाकडून प्रतापगड जिंकून घेतला. गडावर पुन्हा देवीची स्थापना करण्यात आली. देवीचे पूजक, हवालदार, सबनीस वगैरे मानकरी रुजू झाले. त्यांना नख्त नेमणुका करून देण्यात आल्या. देवीची नित्यपूजा आणि धार्मिक विधी पूर्वीप्रमाणे यथासांग सुरू झाले. या वेळी इ.स.१६९१ मध्ये देवीकडील खर्चाची व्यवस्था नीट व्हावी म्हणून मौजे कवडी हा गाव इनाम देण्यात आला.
पुढे राजाराम महाराज, महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजीराजे दुसरे यांस घेऊन कोकणची स्वारी करून प्रतापगडास गेले. तेथे श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन हेळवाक येथे गेले. त्या ठिकाणी त्यांना विशालगडावर असलेल्या महाराणी राजसबाईसाहेब यांचे पोटी संभाजी राजे (द्वितीय) यांचा २३ मे १६९८ मध्ये जन्म झाल्याचे वर्तमान आले. या संभाजी राजांचे जावळ काढण्याचा विधी राजाराम महाराजांनी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात केल्याची नोंद सापडते. महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराजांपासून ते छत्रपती प्रतापसिंह महाराजांपर्यंत सर्व छत्रपतींनी या देवस्थानाला श्रद्धापूर्वक सनदा व भेटवस्तू अर्पण केल्याचे जुन्या कागदपत्रांवरून दिसून येते.
श्री भवानी मातेच्या या संस्थानाची सबनिशी रामचंद्रपत अमात्य यांच्याकडे होती. २१ मे, १६९८ रोजी रामचंद्रपंत अमात्यांनी येसाजी पानसरे हवालदार यांना लिहिलेल्या पत्रात बाळाजी विश्वनाथ यांना ‘कामाचा मर्दाना देखुन सबनिशीची मुतालकी देऊन’… म्हणजे प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे. त्यांजकडून सबनिशीचे काम करून घेणे, असे सांगितलेले आढळते. सरखेल कान्होजी आंग्रे हेदेखील देवीचे भक्त होते. त्यांनी देवीला त्यांच्या वतनातील मौजे कापडे खुर्द, मौजे देवळे व मौजे चरई ही तीन गावे इनाम दिल्याची नोंद सापडली आहे.पेशवेकाळात पुण्याहून देवीला दरवर्षी देवीसाठी त्याचप्रमाणे पुराणिक, उपाध्ये व हवालदार यांच्यासाठीही वस्त्रे पाठविली जात असल्याची माहिती जुन्या कागदपत्रातून मिळते. ही प्रथा पेशवाईनंतरही सुरू होती हे २२ जुलै १८२४ च्या पत्रावरून स्पष्ट होते.
शिवप्रतापाचा जिवंत साक्षीदार असणारा प्रतापगड महादरवाजा भक्कम टेहळणी बुरूज, चिलखती बांधणीची बुरूज रचना, भवानी मंदिर, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार, जिजाऊंचा वाडा, दिंडी दरवाजा, रेडका बुरूज, केदारेवर महादेव मंदिर, सदर यशवंत बुरूज, घोरपड शिल्प, वेताळ मंदिर, कडेलोट स्थान इत्यादी अनेक गौरवशाली ऐतिहासिक अवशेष जपून आहे.या श्री भवानी मातेच्या मंदिराचे बांधकाम आणि रायगडावरील श्री जगदीश्वराच्या मंदिराचे बांधकाम या दोहोंत अतिशय साम्य आढळून येते.
मंदिराच्या दीपमाळेमधील देवळ्या, बाहेरील बाजूस छताकडील नक्षीकाम, ओवऱ्या इत्यादी गोष्टी पाहिल्यावर हा समज आणखीन दृढ होतो. जगदीश्वर मंदिराचे बांधकाम हिरोजी इंदलकरांनी केल्याचे तेथील शिलालेख सांगतो. कदाचित प्रतापगडावरील मंदिरदेखील हिरोजींनीच बांधले असण्याची शक्यता आहे.
सातारा व कोल्हापूरच्या राजघराण्यांचे हे कुलदैवत आहे. सातारकर छत्रपतींचे हे खासगी देवस्थान आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या घराण्यातर्फे या देवीचे वर्षभरातील सर्व कार्यक्रम पार पाडले जातात. दरवर्षी नवरात्रात मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी प्रतापगडाला आवर्जून भेट देतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरु केलेल्या प्रथेनुसार नवरात्रात चवथ्या माळेला रात्री प्रतापगडावर महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडो शिवप्रेमी येतात. देवीच्या देवळाभोवती पारंपरिक वेशभूषा करून हे भक्त पेटत्या मशाली घेऊन देवीची पदे म्हणत रात्रभर नाचत जागर करतात. गड जागता ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते. ही प्रथा गेली ४७ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. गडाच्या तटबंदीवर गेल्या काही वर्षापासून साडेतीनशे मशाली लावून गड उजळवण्यात येतो. गडावर राहणारे चंद्रकांत उत्तेकर आणि त्यांचे सहकारी हा उपक्रम स्वखर्चाने करीत असतात.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे,
९९७५७५९३२५




