पर्यावरण दिनानिमित्त राधानगर-माचुतर येथे वृक्षारोपण ५०० वृक्षारोपण व संगोपनाचा निर्धार.
महाबळेश्वर- राधानगर (माचुतर) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राधानगर शिंदे फाऊंडेशनच्या वतीने राधानगर-माचुतर येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वाढते जागतिक तापमान, हवामान बदल, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास उद्योजक राजेंद्र कुलकर्णी, फाऊंडेशनचे अध्यक्ष, उद्योजक डी. एल. शिंदे, तसेच भगवान शिंदे, डॉ.नंदकुमार शिंदे,सचिन शिंदे, कांतराम शिंदे, दिलीप शिंदे, गणेश शिंदे, नितीन शिंदे,सुभाष कदम, तुषार शिंदे, अरुण शिंदे, प्रशांत शिंदे, दिनेश शिंदे, सुरेश शिंदे, शशिकांत शिंदे, संतोष शिंदे, तसेच प्राथमिक शिक्षक जाधव सर, अनिल सपकाळ, शाळेतील विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष डी. एल. शिंदे यांनी बोलताना, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षी किमान ५०० वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे,” असे सांगितले.
सध्या जगभरात हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. वाढते तापमान, वितळणाऱ्या हिमनद्या, अतिवृष्टी, दुष्काळ आणि जैवविविधतेचा ऱ्हास ही मानवजातीसमोरील मोठी आव्हाने बनली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी भगवान शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व सभासद व मान्यवरांनी फाऊंडेशनच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शवित, समाजाच्या प्रगतीसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी भविष्यातही सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करून हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




