दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्ज व पेपरफुटीविरोधात पाचगणीत सर्वपक्षीय बैठक संपन्न मंगळवारी निघणार भव्य सर्वपक्षीय ‘कँडल मार्च’; विविध संघटना व पक्षांचा उत्स्फूर्त पाठिंबा
पाचगणी:नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज, तसेच पेपरफुटीच्या भ्रष्ट कारभाराला व अन्यायाला कंटाळून प्राण गमावलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाचगणी येथे सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.
या बैठकीमध्ये दिल्लीतील घटनेचा व शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच या घटनेत जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी येत्या मंगळवारी पाचगणी शहरात भव्य सर्वपक्षीय ‘कँडल मार्च’ (मेणबत्ती मोर्चा) काढण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.
अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित:
या बैठकीस विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)महाराष्ट्र प्रदेश कामगार सुरक्षा दल,आझाद समाज पार्टी,वंचित बहुजन आघाडी,बौद्ध विकास सांस्कृतिक मंडळ,संविधान जागर अभियान,पाचगणी जयंती उत्सव समिती,झोपडपट्टी सुरक्षा दल,भारतीय बौद्ध महासभा,सिद्धार्थ सेवा संघ (सिद्धार्थ नगर)
या सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग नोंदवून या जनआंदोलनात सक्रिय उतरण्याचा निर्धार केला.
काँग्रेस व शिवसेना (उबाठा) यांचा पूर्ण पाठिंबा:
काही कारणास्तव राष्ट्रीय काँग्रेस , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि समता सैनिक दल यांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी दूरध्वनी व संदेशाद्वारे मंगळवारी होणाऱ्या ‘कँडल मार्च’ आणि श्रद्धांजली आंदोलनाला आपला पूर्ण व जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
विद्यार्थी व नागरिकांना सहभागाचे आवाहन:
हा कँडल मार्च कोणत्याही एका पक्षाचा किंवा संघटनेचा नसून, संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि निष्पाप मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काढण्यात येत आहे. त्यामुळे पाचगणी आणि परिसरातील तमाम नागरिक, तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या शांततामय कँडल मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वपक्षीय आणि सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.





