या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
प्रतिनिधी -राज्यात सध्या तापमानात वाढ होत असून दुसरीकडे हवामानात होत असलेले अचानक बदल नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. दक्षिणेकडील समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ महाराष्ट्रात थेट धडकणार नसले तरी त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
दिवसाच्या वेळेस तापमानात कमालीची वाढ होत असून संध्याकाळनंतर सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि अचानक बरसणारा पाऊस यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये आंबा, काजू, द्राक्ष, संत्री यांसारख्या फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली असून अवकाळी पावसामुळे त्यांच्यासमोर संकट उभं राहिलं आहे.
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे 29 आणि 30 मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, मात्र पावसाची शक्यता सध्या कमी आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सातारा, सांगली येथे गारवा जाणवेल, तर घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
