निकोबार प्रकल्प म्हणजे एका उद्योगपतीच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी भारतीय मालमत्तेची सर्वात मोठी चोरी: राहुल गांधी
अंदमान आणि निकोबार बेटांवरील कॅम्पबेल बे येथील ग्रेट निकोबार प्रकल्प हा देशातील नैसर्गिक आणि आदिवासी वारशाविरुद्धचा सर्वात मोठा घोटाळा आणि गंभीर गुन्ह्यांपैकी एक असल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. या प्रकल्पामुळे १६० चौरस किलोमीटर पर्जन्यवनातील लाखो झाडांची कत्तल होणार आहे. विकासाच्या भाषेत हा प्रकल्प म्हणजे एक विनाश असून, हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मी संपूर्ण ग्रेट निकोबारचा दौरा केला. मी माझ्या आयुष्यात पाहिलेली ही सर्वात विलक्षण जंगले आहेत. ही जंगले वाढण्यासाठी अनेक पिढ्या खर्ची गेल्या आहेत. या बेटावरील लोक तितकेच सुंदर आहेत, मग ते आदिवासी समुदाय असोत किंवा स्थायिक, परंतु त्यांच्या हक्काचे जे आहे ते त्यांच्याकडून हिरावून घेतले जात आहे,’ असे राहुल गांधी समाज माध्यमावरील एका संदेशामध्ये म्हटले आहे.
‘सरकार येथे जे करते, त्याला प्रकल्प म्हटले जाते. परंतु मी जे पाहिले तो प्रकल्प नाही. येथील लाखो झाडांवर कुर्हाड चालवण्यासाठी खुणा केल्या आहेत. ते १६० चौरस किलोमीटरचे पर्जन्यवन आहे ज्याला नष्ट केले जात आहे. येथील समुदायाच्या घरांवर डल्ला मारताना त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केले गेले आहे. हा विकास नाही. हा विकासाच्या नावाखाली विनाश आहे,’ असेही ते म्हणाले.
‘मी स्पष्टपणे सांगतो आणि सांगत राहीन की ग्रेट निकोबारमध्ये जे केले जात आहे ते देशाच्या नैसर्गिक आणि आदिवासी वारशाविरुद्धच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी आणि गंभीर गुन्ह्यांपैकी एक आहे. हे थांबलेच पाहिजे. मी जे पाहिले ते जर भारतीयांनी पाहण्याचे ठरवले, तर हे थांबवता येऊ शकते,’ असे राहुल यांनी नमूद केले.
हा विकास नाही. हा विकासाच्या नावाखाली विनाश आहे या बेटावर राहणारी प्रत्येक व्यक्ती या प्रकल्पाच्या विरोधात आहे, पण त्यांना या प्रकल्पाबद्दल विचारले गेले नाही किंवा त्यांना काय भरपाई मिळणार, हेदेखील त्यांना माहीत नाही.- राहुल गांधी,
काँग्रेस नेते




