महाबळेश्वरची वाहतूक कोंडी सुटणार; शहरात लवकरच ‘वन-वे’सह पार्किंगचे नवीन नियम लागू
महाबळेश्वर:महाबळेश्वर शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महाबळेश्वर नगरपरिषदेच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत प्रशासनाने विविध उपाययोजनांवर शिक्कामोर्तब केले. यामध्ये मुख्यत्वेकरून खालील मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली आहे:
एकमार्गी (वन-वे) वाहतूक:शहरातील गर्दीच्या आणि मुख्य रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ‘वन-वे’ वाहतूक व्यवस्था लागू केली जाणार आहे.
कठोर पार्किंग व्यवस्था:रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी नियोजित पार्किंगची व्यवस्था काटेकोरपणे अंमलात आणली जाणार आहे.
वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध: गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक वाहनांच्या प्रवेशावर आवश्यकतेनुसार निर्बंध लादले जाणार आहेत.
प्रशासनाचा इशारा आणि आवाहन:
या बैठकीत नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले, तर मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे सूचित केले. पोलीस विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, आपत्कालीन सेवांना (ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल) वाहतुकीत प्राधान्य मिळावे, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे ठरवले आहे.
समन्वयातून कार्यान्वित होणार यंत्रणा:
या बैठकीत नगरपरिषदेचे अधिकारी, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSEB आणि टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे वाहतूक व्यवस्थापन सक्षम करण्याचा निर्धार केला आहे. उन्हाळी हंगामात पर्यटकांची मोठी वर्दळ पाहता, सर्व विभागांनी आपापली तयारी पूर्ण ठेवावी, अशा सूचना नगरसेवकांनी यावेळी केल्या.
या बैठकीस नगराध्यक्ष सुनिल शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, वैभव भिलारे, प्रभारी कार्यकारी अभियंता रेड्डी, कनिष्ठ अभियंता धुमाळ, कर व प्रशासकीय अधिकारी अमित माने, नगर अभियंता धायगुडे,वरिष्ठ लिपीक बबन जाधव तसेच टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची व पर्यटकांची सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




