महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा येथे भेट घेतली त्या मध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर निवेदन देऊन चर्चा करण्यात आली:-
1) NCERT अभ्यासक्रमातून अन्यायकारक रित्या नकाशा वगळला असून त्या मुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या भावना तीव्र आहेत, महाराष्ट्र सरकारने या संबंधी निषेध नोंदवावा व नकाशा अभ्यासक्रमात सन्मानाने पुन्हा समाविष्ट करण्यात यावाया साठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा.
2). जिहे कटापूर योजनेचा नाबार्ड च्या योजनेत समावेश करण्यात यावा.
3) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेवर आलेल्या स्थगितीमुळे आज अनेक पात्र युवक- युवतींची स्वप्ने अधांतरी राहिली आहेत. अनेक वर्षें कठोर परिश्रम, अभ्यास, आर्थिक अडचणी आणि कुटुंबाच्या अपेक्षा यांचा सामना करत उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झाले. दिवस-रात्र मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व गरीब कुटुंबातील अनेक युवक या भरतीवर आपल्या संपूर्ण भविष्याचा आधार ठेवून आहेत. काही उमेदवारांच्या घरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. उमेदवारांच्या घरावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे तर काही जणांच्या विवाहाचे निर्णयही या नोकरीवर अवलंबून आहेत. अनेक कुटुंबांनी “आता मुलाला नोकरी लागली” या आशेवर पुढील आयुष्याची स्वप्ने रंगवली होती. परंतु, अचानक आलेल्या स्थगितीमुळे हजारो कुटुंबांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक उमेदवार मानसिक तणावाखाली असून, “आता पुढे काय” हा प्रश्न त्यांना सतावत आहे. एका नोकरीसाठी युवक किती संघर्ष करतो हे आपण जाणता, वर्षानुवषे अभ्यास, स्पर्धा परीक्षा, घरची आर्थिक अडचण आणि समाजातील अपेक्षा या सगळ्यांशी झुंज देत उमेदवारांनी हा टप्पा गाठला आहे.
तरी, ही भरती हजारो युवकांच्या आयुष्याचा, त्यांच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा प्रश्न आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने युवकांच्या भावना समजून घेऊन भरती प्रक्रिया पुर्ण झालेली असल्याने या भरतीवरील स्थगिती तात्काळ उठवावी व नियुक्ती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली.
4) ऐतिहासिक बेलापूर किल्ला हा सिडको हद्दीत येत असून, वाढ त्या शहरीकरणामुळे किल्ल्या भोवती अतिक्रमणे वाढली असून किल्ल्याची दुरुस्ती सुद्धा करण्याची गरज आहे. सिडको कडून या पूर्वी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला असून किल्ले संवर्धनाचा अनुभव नसल्याने केलेला खर्च वाया गेला असे तिथल्या स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे सिडको व सांस्कृतिक विभागाच्या समन्वयाच्या माध्यमातुन किल्ले दुरुस्ती पुरातत्व विभागाकडून केल्यास सिडको कडून निधी प्राप्त होऊ शकतो, तरी आपण स्वतः लक्ष घालून या किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती करून घ्यावी अशी विनंती केली.
5) केंद्र शासनाच्या विविध विभागाच्या अभिलेखात बर्याच वेळा देवनागरी मध्ये सतारा असा उल्लेख आढळतो, त्यामुळे देशभरात ऐतिहासिक सातारा जिल्ह्याचे नाव सतारा असे समजून त्यामुळे देशभरातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, या संबंधी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करून सर्व अभिलेखात “सातारा” असे करावे अशी विनंती केली.
6) छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावी अशी विनंती केली.
7) सैनिक स्कूल सातारा या शाळेच्या बाबतीतील समस्यांवर चर्चा झाली त्यामधे प्रामुख्याने शाळेच्या संरक्षक भिंतीच्या शेजारील रस्ते रुंदीकरण, शाळेच्या बांधकामाच्या environmental clearance, शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या फी मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सवलत देण्यात यावी.
या बरोबरच जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या व निधी उपलब्ध करून देण्या संबंधी चर्चा केली. या प्रसंगी सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुती समन्वयक श्री सुनील काटकर, किल्ले प्रतापगड प्राधिकरण समिती सदस्य श्री काका धुमाळ, श्री नंदकुमार माने, श्री लक्ष्मण कडव, श्री चिन्मय कुलकर्णी, जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती सदस्य अॅड श्री विनित विलास पाटील, श्री अविनाश माने उपस्थित होते.




