सातारा वन विभागाचा मान उंचावला; राजाराम काशीद यांना मंत्र्यांचे अभिनंदन
वनपाल राजाराम काशीद यांच्या अभ्यासपूर्ण कामाचे मंत्री गणेश नाईक यांनी केले कौतुक
सातारा : सातारा वन विभागातील वनपाल राजाराम सुभाष काशीद यांच्या उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाने दखल घेतली असून, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांना विशेष कौतुकपत्र देऊन सन्मानित केले आहे.
काशीद यांनी तयार केलेल्या निसर्गक्षेत्र पुस्तिका (बीट बुक) व परिसंस्था पुस्तिका (राऊंड बुक) यामध्ये वनक्षेत्राची सविस्तर माहिती, जैवविविधता, मानव-वन्यजीव संघर्ष, गावांची माहिती तसेच ‘कास पठार’ सारख्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाची माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने संकलित करण्यात आली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्राद्वारे काशीद यांच्या समर्पण भावनेचे, अभ्यासू वृत्तीचे आणि उत्कृष्ट नोंद कार्याचे कौतुक केले. तसेच अशा दक्ष वनपालांमुळे राज्यातील वनक्षेत्र सुरक्षित राहून त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले.
यासोबतच भविष्यातही आपण असेच उत्कृष्ट कार्य करत राहाल, असा विश्वास व्यक्त करत विभाग आपल्या पाठीशी कायम राहील, अशी ग्वाहीही मंत्र्यांनी दिली.वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या सन्मानामुळे आनंदाचे वातावरण असून, राजाराम काशीद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




