महाबळेश्वरकरांना दिलासा: घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वादावर पडदा
महाबळेश्वर प्रतिनिधी- महाबळेश्वरमधील घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वाढीवरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घरपट्टीच्या जुन्या दरात घरगुती वापरासाठी १५ टक्के, तर व्यावसायिक वापरासाठी ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, पाणीपुरवठा योजनेबाबत जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
महाबळेश्वरमधील ग्रेस कॉटेज येथे झालेल्या या बैठकीला महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, राजेंद्र राजपुरे, रमेश चोरमले, डी. एम. बावळेकर, विमलताई पार्टे, ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, दत्ता वाडकर, विशाल तोष्णिवाल, रोहित ढेबे, प्रकाश पाटील, विजय नायडू, सतीश ओंबळे, राजेंद्र पवार, महेश कोमटी, रवींद्र कुंभारदरे, ओंकार दीक्षित, सुनील ढेबे, राजेंद्र पंडित, सचिन गुजर, गोविंद कदम, उस्मान खारकंडे, तौफिक पटवेकर यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी पाटील यांनी घरपट्टीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी आपली भूमिका मांडली. चर्चेअंती ना. पाटील यांनी २०११-१२ च्या दरामध्येच घरगुतीसाठी १५ टक्के आणि व्यावसायिक वापरासाठी ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच, व्यावसायिक वापरासाठी लावण्यात आलेली अ, ब, क श्रेणी रद्द करून जुन्या दरात वाढ करण्याचे आदेश दिले.
पाणीपुरवठा योजनेवर तोडगा काढण्याचे आश्वासन:
महाबळेश्वरमधील पाणीपुरवठा योजनेबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जीवन प्राधिकरणाकडून आकारण्यात येणारे वाढीव दर, धरणातील गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी आणि त्यामुळे पालिकेवर पडणारा आर्थिक भार यावर उपाययोजना काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. तसेच, भुयारी वीज वितरण योजनेबाबतही लवकरच मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.या बैठकीत महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष विजय नायडू यांनी आभार मानले.
