कोंडवे खिंडीत पर्यावरणाचा उत्सव; वन विभागाच्या उपक्रमाला सामाजिक संस्थांचे भक्कम पाठबळ
05 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साताऱ्यात कोंडवे खिंड परिसरात राखीव वनक्षेत्रात विविध स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड तसेच वडाच्या झाडाचे यशस्वीरित्या पुनर्रोपण करण्यात आले. सिने अभिनेता सयाजी शिंदे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती
सातारा -जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सातारा वन विभाग आणि सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 05/06/2026 रोजी सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत कोंडवे खिंड येथील राखीव वनक्षेत्रात वृक्षारोपण तसेच वृक्ष पुनरोपण कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या प्रसंगी मौजे कोंडवे येथील एका जुन्या वडाच्या झाडाचे या परिसरात शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करण्यात आले. तसेच या परिसरामध्ये पर्यावरणाला पूरक अशा स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड प्रसिद्ध सिने अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे संस्थापक श्री. सयाजी शिंदे यांच्या हस्ते व उपस्थित असणाऱ्या प्रामुख्याने ड्रोन्गो पर्यावरण संरक्षण संस्था, मेरी संस्था, हरित सातारा ग्रुप, कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुप, अवार्ड संस्था, राजे करिअर अकॅडमी, गच्चीवरची परसबाग, शाहूपुरी रनर्स, ओम ग्रुप शाहूपुरी, हिंदवी पब्लिक स्कूल, वेद अकॅडमी, योग विद्या धाम या सर्व संस्थांच्या सदस्यांनी, मौजे कोंडवे गावातील नागरिक व शहरातून सदर कार्यक्रमास आलेले नागरिक यांच्यामार्फत विविध स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘चला, एक पाऊल हरित साताऱ्याच्या दिशेने!’ हा संदेश देत शेकडो सातारकरांनी, तरुणांनी आणि निसर्गप्रेमींनी या चळवळीत स्वतःला झोकून देत मोठा उत्साह दाखवला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत कोंडवे खिंड राखीव वन परिसरात नागरिकांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले. श्री. सयाजी शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरण रक्षण ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी बोलताना वृक्षाला देवापेक्षा कमी महत्त्व नाही, असे उद्गार त्यांनी व्यक्त केले. सदर वृक्ष लागवड कार्यक्रमावेळी उपस्थित नागरिक, विद्यार्थ्यांना गायत्री मंत्राचे सामूहिक पठण व वृक्ष संगोपनाबाबत प्रतिज्ञा देण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलतेवेळी सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) यांनी येत्या नजीकच्या काळात कोंडवे परिसरात नैसर्गिक उद्यान विकसित करणार आहे व त्याचा फायदा या परिसरातील तसेच शहरातील लोकांना होणार आहे, असे सांगितले.
सदरच्या कार्यक्रमासाठी मानद वन्यजीवरक्षक श्री. सुनील भोईटे, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती जयश्री जाधव, श्री. दिगंबर जाधव, श्री. प्रदिप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. गणेश महांगडे, नगरसेवक विश्वतेज बालगुडे, शोभा केंडे, अॅड. नीलिमा कदम, किरण कदम, सोनाली गायकवाड, हमसेरा मॅडम, योगेश जगदाळे, खुशी जोशी, डॉ. किरण जोशी, सरिता शिंदे, साईराज पवार,उमेश खंडूजोडे, विकास बहुलेकर, मंजुश्री पवार, पुनम गुरव, सोहम कुलकर्णी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बहुमूल्य योगदान दिले.
सातारा शहराला अधिक हरित आणि सुंदर बनवण्यासाठी वन विभागाच्या या हाकेला साताऱ्यातील नामांकित सामाजिक संस्थांनी एकत्र येत भक्कम पाठबळ दिले. सातारकरांच्या या अभूतपूर्व एकत्र येण्यामुळे कोंडवे खिंड परिसरात आज खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचा जागर पाहायला मिळाला.




