पहिल्या अपघातातून वाचले, लगेच दुसरा अपघात, सहाही जणांचा मृत्यू, काळजाचा थरकाप उडाला; बीड हादरलं
बीड : बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली असून, अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला.
प्राथमिक माहितीनुसार, गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यामुळे हे सहा जण गाडी आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने थेट त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतांमध्ये सहा जणांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून अपघातग्रस्त कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
