रमजानच्या उपवासात जपली माणुसकी; केळघर घाटातील अपघातग्रस्तांसाठी शकील पटेल आणि अज्जू कुरेशी धावले मदतीला.
महाबळेश्वर:पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू असताना, माणुसकीचा एक मोठा आदर्श महाबळेश्वरच्या दोन युवकांनी जगासमोर ठेवला आहे. केळघर घाटात झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमींना रुग्णवाहिकेची वाट न पाहता, स्वतःच्या गाडीतून तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांनी एका महिलेचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. शकील पटेल आणि अजमुद्दीन (अज्जू) कुरेशी या दोन तरुणांच्या या समयसूचकतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल केळघर घाटात एका हुंडाई गाडीला भीषण अपघात झाला. या गाडीमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की, त्यातील एक महिला अतिशय गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मोठी इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. अपघातग्रस्त मदतीसाठी टाहो फोडत होते, मात्र घाट रस्ता असल्याने तातडीने मदत मिळणे कठीण होते.
देवदूतासारखी आली मदत
त्याच वेळी सातारा येथून महाबळेश्वरकडे रांजनवाडी येथील शकील पटेल आणि अजमुद्दीन कुरेशी हे आपल्या तवेरा गाडीने येत होते. घाटात झालेला अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली गाडी थांबवली. जखमींची अवस्था पाहून त्यांनी रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता, माणुसकीच्या नात्याने तातडीने पावले उचलली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या गंभीर जखमी महिलेला आणि इतर प्रवाशांना त्यांनी आपल्या तवेरा गाडीत घेतले आणि तातडीने महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपवासातही कर्तव्याला प्राधान्य
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून शकील पटेल आणि अज्जू कुरेशी यांचे उपवास (रोझा) सुरू आहेत. कडक उन्हाळा आणि उपवास असतानाही, थकव्याची तमा न बाळगता त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि समयसूचकता खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरली आहे. त्यांच्या या मदतीमुळे जखमींना वेळेत उपचार मिळाले असून, त्या महिलेची प्रकृती स्थिर होण्यास मदत झाली आहे.
महाबळेश्वरच्या नावलौकिकात भर.
शकील आणि अज्जू यांच्या या कार्यामुळे महाबळेश्वरच्या सामाजिक बांधिलकीचा आणि सहृदयतेचा नावलौकिक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. माणुसकी हाच खरा धर्म” असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अशा तरुणांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.




