गोरगरीबांच्या उद्धारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समर्पित जीवन इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे म्हावशी येथे जयंतीनिमित्त व्याख्यान
खंडाळा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. दलितांच्या उद्धारासाठी अखंड आयुष्य झिजवलं. छत्रपती शिवरायांपासून पुढे महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज , डॉ. आंबेडकर असा सामाजिक जडणघडणीचा मोठा वैचारीक धागा गुंफला गेला होता. उच्चशिक्षण घेऊनही केवळ समाजबांधवांच्या उद्धारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समर्पित जीवन जगले. त्यांच्याच विचाराने उद्याचा सक्षम समाज घडू शकतो असा विश्वास इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केला.
म्हावशी ता. खंडाळा येथे बौद्ध विकास मंडळाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ते बोलत होते. यावेळी सरपंच कृष्णात भुजबळ , सोसायटीचे अध्यक्ष दिनकर राऊत , ग्राम पंचायत सदस्य बापूराव राऊत , प्रज्ञा जावळे , गौतम जावळे , सुरेश जावळे , प्रदीप जावळे यांसह प्रमुख उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन समाजव्यवस्था व वर्णव्यवस्थेविरोधात पाऊल उचलले. शिक्षण हाच दलित व मागास समाजातील लोकांच्या उद्धाराचा मार्ग आहे. त्यासाठी शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा जगण्याचा मंत्रच त्यांनी दिला. प्रखर बुद्धीमत्ता आणि अखंड अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अनेक पदव्या मिळविल्या. परंतु या शिक्षणाचा उपयोग समाजातील लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी झाला पाहिजे या तत्वाशी ते कायम बांधिल राहिले. बुद्ध , कबीर आणि महात्मा फुले यांना त्यांनी गुरु मानले होते. तर विदया , विनय आणि शिलता हे त्यांचे दैवत होते. समता , स्वातंत्र्य आणि बंधुता ही त्यांची तत्वे होती. या तत्वांचा अंगीकार कायम त्यांनी केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र दिला. कायदातज्ञ , जलतज्ञ , अर्थतज्ञ , ऊर्जातज्ञ म्हणून डॉ. आंबेडकरांनी या देशाला नवी दिशा दिली. त्याच वाटेवर चालत राहिल्या देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. म्हणूनच त्यांच्या विचारांची जोपासना करून त्याची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.
