जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे रिपाइं आठवले गटाचे अर्धनग्न आंदोलन
सातारा -फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयामागे पडीक असणारी जागा बुद्ध विहारासाठी देण्यात यावी यासाठी २६ वर्षांपासून लढा सुरू आहे. यासाठी फलटण तहसील कार्यालयासमोर ४३ दिवसांपासून आंदोलन सुरू असून याबाबत दखल घेतली जात नाही. त्यामुळे ही जागा तातडीने मंजूर करावी, या मागणीसाठी रिपाइं आठवले गटाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारविरोधात मोठया प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
साखरवाडीतील बुद्ध विहाराच्या जागेसाठी बौद्ध समाजाचे जनआंदोलन सुरु आहे. बुद्ध विहाराला साखरवाडीत उपलब्ध असलेली ८ गुंठे महाराष्ट्र शासनाची जागा बुद्ध विहाराला द्या. बौद्ध समाजावर होणारा अन्याय थांबवा. शासनाच्या विविध योजनांमध्ये धार्मिक स्थळांची जागा मंजूर केल्या जातात त्याच धर्तीवर बुद्धविहाराला जागा मंजूर करावी. बुद्ध विहाराबाबत होणार राजकीय हस्तक्षेप थांबवावा. लवकर जागा मंजूर करून बौद्ध समाजाला न्याय द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अशोक गायकवाड म्हणाले, आता अस्तित्वाच्या लढ्याची सुरुवात आहे. कित्येक वर्षे बुद्ध विहारासाठी संघर्ष सुरू आहे. पण आज तो निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. हा लढा केवळ जागेसाठी नाही, तर बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आहे.तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.यावेळी स्वप्निल गायकवाड, आप्पा तुपे, पूजा बनसोडे, अक्षय साळवे, विजय येवले, संतोष गायकवाड, शिवाजी सर्वागोड, श्रीकांत निकाळजे, एकनाथ रोकडे, उत्तम कांबळे, जॉन जोसेफ, प्रतिक गायकवाड, आदित्य गायकवाड उपस्थित. यावेळी सातारा जिल्ह्यातील रिपाई चे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
