दत्ता पवार : पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला न्याय देणारे व्यक्तिमत्त्व
जावली खोऱ्यातील सायगाव ते सातारा परिसरात पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली २५ वर्षे सातत्याने कार्यरत असलेले दत्तात्रय (दत्ता) पवार हे नाव विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जाते. बातमीचा सखोल मागोवा घेऊन सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. त्यामुळे समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
दत्ता पवार यांनी विविध दैनिकांमध्ये काम करताना लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनतेमध्ये समन्वय साधून सकारात्मक लेखन करत तर काही वेळेला चुका दाखवून त्या सुधारण्यासाठीसुद्धा आपल्या लेखणीचा वापर केला आहे. अशा पत्रकारांपैकी पत्रकारितेची पॉवर बँक म्हणून देखील त्यांची ओळख आहे.
ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक विषय, विकासकामे आणि जनतेच्या अडचणी प्रभावीपणे ते मांडत असतात. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित न ठेवता समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून त्यांनी जपली. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताची भूमिका यामुळे त्यांनी वाचकांचा मोठा विश्वास मिळवला आहे.
आजही ते पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.
जावली तालुक्यातील मेरूलिंगच्या पायथ्याशी दरेखुर्द एक ऐतिहासिक गाव आहे. या गावातील पवार कुटुंबीयांमध्ये दत्ता पवार यांचा ७ जून १९८२ रोजी जन्म झाला.दत्ता पवार यांचे वडील आत्माराम पवार हे शेतकरी असल्यामुळे आपल्या मुलांनी फक्त शेती करू नये तर उच्चशिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी अशी त्यांची इच्छा. या अपेक्षेची पूर्तता करत असताना दत्ता पवार यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या दरे खुर्द शाळेमधून शिक्षणाचा श्री गणेशा केला. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः पवारवाडी येथे येऊन स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. एक हुशार विद्यार्थी म्हणून दत्ता पवार यांनी नावलौकिक प्राप्त केला. सुंदर हस्ताक्षर, सुंदर विचार आणि सुसंस्कार अशा परिपूर्ण गुणांनी संपन्न असे हे व्यक्तिमत्त्व. पुढे अकरावी, बारावी शिक्षणानंतर सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कला शाखेतून पदवी संपादन केली. अर्थशास्त्रातून एम. ए. झाले. पुढे पीएच.डी. करून प्राध्यापक होण्याची त्यांची मनस्वी इच्छा होती. परंतु सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याला स्थिरता यावी यासाठी विमा काढणे गरजेचे आहे. हे ओळखून त्यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेवेमध्ये
कौन्सिलर म्हणून काम करण्याचा शुभारंभ केला. पुढे पत्रकार पदवी घेऊन पत्रकारितेत पदार्पण केले.
पत्रकारितेच्या माध्यमातून अग्रगण्य दैनिकातून जावली तालुका प्रतिनिधी म्हणून सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील प्रामाणिक व जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवून चांगली बातमी देण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी लेखणी उपयुक्त ठरत आहे, हाच खरा पुरस्कार असल्याचे ते मानतात. चांगल्या गोष्टीला चांगले व वाईट प्रवृत्तीला वाईट म्हणण्याची ताकद त्यांच्या लेखणीमध्ये आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने त्यांच्या हितचिंतक व मित्र परिवाराला मनस्वी आनंद होत आहे. आपले मत लोकांवर न लादता जे चांगले आहे ते लोकांपर्यंत निर्भीडपणे मत मांडण्याची त्यांची हातोटी हे त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त जावली तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्रांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा.




