सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य
मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार समारंभ पार पडला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलखुलास राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक दशके एका विचाराकरिता समर्पित असे जीवन जगले, जनसामान्यांचे नेते म्हणून सातत्याने आपली राजकीय कारकीर्द चालवली, अशा भारत सरकारच्या राज्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचे व्यक्तिमत्त्व हे संघर्षातून घडले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रसंगी महत्त्वाची भूमिका निभावत लोकाभिमुख पद्धतीने त्यांनी संघर्ष उभा केला. राजकारणात आल्यानंतरही त्यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून कधीही फारकत घेतली नाही. तसेच संघर्षातून नेतृत्व तयार झाले असले तरी त्यांच्यामध्ये कोणत्याही व्यक्ती, पक्षाबद्दल किंवा धर्माबद्दल कटुता आली नाही. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचा सर्वपक्षीय जिव्हाळा कायम आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या सहकार्याने ज्यांनी भारताला संविधान दिले, त्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याची संधी महाराष्ट्र सरकारला मिळाली. तसेच, जपानमधील कोयासन विद्यापीठातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच लंडनमधील त्यांच्या घराच्या लिलावाचा प्रश्न सोडवण्यासाठीदेखील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.





