चाफळला श्रीराम जन्म सोहळ्याला हजारो भाविकांची हजेरी
चाफळ प्रतिनिधी –लाखो भाविकांसह परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेल्या तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराममंदीरात “सत् सीता रामचंद्र की जय’….’प्रभु रामचंद्र की जय’ चा प्रचंड जयघोष करीत शेकडो धगधगत्या दिवट्या व मानाच्या सासनकाठ्यांच्या साक्षीने हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत गुलाल-पुष्पाची उधळण करीत अभूतपूर्व मंगलमयी वातावरणामध्ये 379 वा श्रीरामनवमी जन्मसोहळा गुरुवारी दुपारी 12.20 वाजण्याच्या सुमारास साजरा झाला. श्रीराम जन्मसोहळ्या वेळी भाविकांनी गुलालासह केलेल्या पुष्पवर्षावामुळे मंदीर परिसरात फुलांचा व गुलालाचा अक्षरश: सडा पसरल्याने संपूर्ण मंदीर परीसरातील वातावरण राममय झाले होते.
गुरुवारी सकाळ पासूनच प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सीतामाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. यामुळे मंदीर परिसर भाविकांनी अक्षरशः गजबजून गेला होता. युवक-युवतीच्या झुंडीच्या झुंडी प्रभुराम नामाचा जयघोष करत गुलालमय वातावरणात न्हावून गेल्या होत्या. यात्रेचे नवमी, दशमी व एकादशी हे प्रमुख तीन दिवस असले तरी चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून या यात्रेस प्रत्यक्ष प्रारंभ होतो. मुख्य दिवशी म्हणजेच गुरुवारी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, 5.30 वाजता श्रीरामाची पूजा, रामनाम जप, 6 वाजता गीतापठन, 8.30 ते 10 वाजता भजन व आरती घेण्यात आली. 11 ते 12 वाजता श्रीराम मंदीराला तेरा प्रदक्षिणा घालत श्रीराम, मारुती, शंकर, देवी, कृष्णामाई, श्रीकृष्ण, गणपती अशा देवतांच्या आरत्या प्रदक्षिणाचे वेळी चालीवर म्हणण्यात आल्या. रामनवमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दशरथ व कौशल्या माता यांच्या पोटी चैत्रशुध्द नवमीला दुपारी 12.20 वाजता प्रभुरामाचा जन्म झाला. तो दिवस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या श्रध्देने व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. मुख्य दिवशी प्रभुरामास अभ्यंगस्नान घातल्यावर त्यांची विधीवत पूजा, पौरोहित्य विधी पुरोहितांनी केला. श्रीरामास न्हाऊ घातल्यानंतर रामाला पाळण्यात घालण्यात आले. पाळणा गीतानंतर श्रीरामास अधिकारी स्वामी सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी यांच्या ओट्यात देण्यात आले. यावेळी के. बी. क्षीरसागर यांचे लळिताचे कीर्तन झाले. श्रीराम जन्मसोहळ्यानंतर सर्व भाविकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. लळिताचे कीर्तनास पेटीसाथ दीपक सपकाळ यांनी केली तर ज्ञानेश्वर वनारसे यांनी तबला साथ दिली.
दशमीला दि. 27 रोजी सकाळी समर्थ वंशज चाफळनगरी मधून फिरुन भिक्षावळ गोळा करतात. दि. 28 रोजी सायंकाळी सात वाजता सवाया, आरती झाल्यानंतर शेकडो मशालींच्या उपस्थितीत रांगेतून श्रीराम व मारुतीची चांदीची मूर्ती पालखीमध्ये ठेवून छबीना काढला जातो. हा छबीना दर्शनी पायऱ्यावरुन रथाचे मानकरी साळुंखे बंन्धू यांच्यामार्फत रथाकडे नेला जातो. तद्नंतर रथामध्ये विमान ठेवण्यात येते. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी चाफळसह परीसरातील भाविक, ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने हजेरी लावतात. रविवार, दि. 29 मार्च रोजी एकादशीला सुर्योदयाबरोबर श्रीरामाची विमानरुपी पालखीत प्रतिष्ठापना करुन रथातून सवाद्य मिरवणूक काढली जाते.
यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, कुस्ती कमिटी, भंडारा कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक यांनी परीश्रम घेतले. ट्रस्टच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष दिलीप पाठक, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, विश्वस्त योगेशबुवा रामदासी, समर्थ वंशज बाळासाहेब स्वामी, गिरीष सोहनी, सौ. मानसी माचवे, लक्ष्मण बाबर, ए. एच. साळुंखे, व्यवस्थापक अरुण गायकवाड यांनी भाविकांसाठी सुविधा पुरविल्यामुळे भाविकांना यात्रेचा लाभ घेणे सुलभ झाले.
यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले, हवालदार राजेंद्र पगडे व राजेश शारुक यांचेसह पोलीस कर्मचारी, होमगार्ड, महिला पोलिस असा चोख बंदोबस्त ठेवला होता.




