कर्जमाफीसाठी सातबारा कोरा करा यासाठी बच्चू कडू आक्रमक
नागपूर :कर्जमाफी, सातबारा कोरा करा, या व अन्य अशा प्रमुख मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांच्या महा एल्गार आंदोलनाची धास्ती राज्यसरकारने घेतली आहे. आंदोलक सिव्हिल लाईन्स मध्ये शिरण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी समोर संचारबंदी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. रोज सायंकाळ गजबजणारा वाॅकर्स स्ट्रीट वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कामगिरीकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे संपूर्ण रामगिरीला छावणीचे स्वरूप आले आहे.
सोबतच आंदोलक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशिमबागकडेही जाऊ शकतात अशी गुप्त सूचना मिळताच पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी देखील कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. या घडामोडीत वर्ध, चंद्रपूर आणि हैदराबादकडून येणारी आणि जाणारी सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प पडली आहे. बुटीबोरी ते जामठा रस्ता संपूर्णपणे आंदोलनामुळे जाम झाला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्धा मार्गांवर ठाण मांडल्याने मिहान पुलाखाली चक्का जाम झाला आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी, विजय जावंधियी, माजी मंत्री महादेवराव जानकर, रविकांत तुपकर आंदोलनस्थळी कापूस संशोधन केंद्राशेजारील मैदानात दाखल झाले आहेत. प्रहारचे प्रणेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे स्वतः ट्रॅक्टर चालवत आंदोलनात सहभागी होत आहेत.




