आंबेदरे ग्रामस्थांची एकजूट ठरली प्रेरणादायी; स्मशानभूमीत उभारले सुसज्ज अग्निकुंड
सातारा : स्मशानभूमी म्हणजे आयुष्याचा अंतिम प्रवास जिथे सुखकर व्हावा अशी जागा. पण आंबेदरे गावाची हीच अंतिम विश्रामभूमी गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेच्या गर्तेत होती. जिथे प्रेत दहन केले जायचे, तिथे तब्बल फूटभर खोल खड्डा पडला होता. इतकेच काय, तर अंत्यसंस्कारानंतर अस्थी विसर्जनाच्या वेळी नातेवाइकांना आपल्या माणसांच्या अस्थी शोधतानाही प्रचंड हाल सोसावे लागत होते. अग्निकुंडाची ही विदारक अवस्था पाहून अखेर ग्रामस्थांचे काळीज हेलावले आणि त्यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतःच बदलाचे पाऊल उचलले.
सातारा तालुक्यातील आंबेदरे, जाधववाडी आणि धनवडेवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत आपल्या एकीचा एक नवा आदर्श संपूर्ण परिसरासमोर उभा केला आहे. सर्वांनी मिळून तब्बल ७८ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा केली. या पवित्र कामासाठी कपिल अहिरे यांनी खडी व ग्रीट, तर दिनकर जाधव यांनी सिमेंटची पोती देऊन मदतीचा हात पुढे केला. केवळ पैसा किंवा साहित्यच नव्हे, तर गावातील प्रत्येकाने श्रमदानातून या कामात घाम गाळला आणि हा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न कायमचा मार्गी लावला.
यापूर्वीही पावसाळ्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असताना, याच ग्रामस्थांनी एकत्र येऊन तो रस्ता दुरुस्त केला होता. आता हक्काचे आणि सुसज्ज अग्निकुंड उभारल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यांतील अश्रूंना समाधानाचे रूप मिळाले आहे. ग्रामस्थांच्या या सामूहिक भावनेने आणि एकीच्या बळाने मृत्यूनंतरच्या प्रवासाला हक्काचा सन्मान मिळवून दिला. ग्रामस्थांच्या एकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, सामाजिक एकी आणि लोकसहभागातून विकासाची कामे कशी घडू शकतात याचा आदर्श आंबेदरे गावाने घालून दिला आहे.




