सातारा-सांगली विधान परिषद विजयाने जयकुमार गोरे यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित
सातारा (अली मुजावर )सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी मिळवलेला विजय आणि सोलापूर जिल्ह्यात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या यशामुळे राज्यातील महायुतीच्या राजकारणात मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, सातारा आणि सांगली जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यात मंत्री जयकुमार गोरे यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयकुमार गोरे यांनी गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये पक्षाला उल्लेखनीय यश मिळवून देण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली आहे.
सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामे, संघटन विस्तार आणि कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क या त्रिसूत्रीच्या बळावर भाजपने आपला जनाधार वाढविला असल्याचे पक्षाचे नेते सांगतात. विशेषतः ग्रामीण भागात विकासकामांच्या माध्यमातून भाजपला बळकटी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
धैर्यशील कदम यांच्या विजयामुळे सातारा-सांगली भागात भाजपचे वर्चस्व आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे. तर सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत यांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची ताकद वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या निकालांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत मंत्री जयकुमार गोरे यांचे स्थान अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.




