साताऱ्यात 26 व 27 एप्रिलला “भाषण जमणारच..” कार्यशाळा
सलग दोन दिवसांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
सातारा प्रतिनिधी : सुप्रसिद्ध व्याख्याते व “भाषण जमणारच..” या अनुभवसिद्ध पुस्तकाचे लेखक जयंत लंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शब्दप्रभू वक्तृत्व अकादमी तर्फे साताऱ्यात शनिवार, दि. 26 व रविवार, दि. 27 एप्रिल रोजी दोन दिवसीय वक्तृत्व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
साताऱ्यातील राजवाडा चौपाटीलगत असलेल्या वीरसिद्धी हनुमान मंदिराच्या पहिल्या मजल्यावर अश्वमेध वाचनालयाच्या भाऊसाहेब सोबत सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी 5 या वेळेत सलग दोन दिवस ही “भाषण जमणारच..” कार्यशाळा संपन्न होणार आहे.
श्री जयंत लंगडे हे शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनचे सुप्रसिद्ध व्याख्याते असून विविध विषयांवरील व्यासंगातून त्यांनी ठीक ठिकाणी आपल्या वक्तृत्व कलेतून श्रोत्यांना प्रबोधित केले आहे. “भाषण जमणारच..” या विषयावर त्यांनी अनुभवसिद्ध मार्गदर्शनपर पुस्तकही लिहिले असून विविध ठिकाणच्या व्याख्यानमाला व संमेलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
साताऱ्यात शब्दप्रभू वक्तृत्व अकादमी तर्फे होत असलेली ही पंधरावी कार्यशाळा असून यापूर्वी विविध वयोगटातील आणि अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी या कार्यशाळेतून वक्तृत्वाचे धडे गिरवले आहेत. या बॅचमध्ये सलग दोन दिवसात आठ संत्रांच्या माध्यमातून सहभागी भाषणेच्छूक व्यक्तींना जयंत लंगडे यांच्या सिद्धहस्त मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
सहभागी शिबिरार्थींना दुपारच्या भोजनाची व्यवस्थाही संयोजकांतर्फे करण्यात आली असून दोन दिवसांच्या कार्यशाळेसाठी अडीच हजार रुपये सहभाग शुल्क ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपासून सामाजिक राजकीय नेतेमंडळींपर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन शब्दप्रभू वक्तृत्व अकादमी तर्फे करण्यात आले आहे.
