१२ फेब्रुवारीस कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ
कुलपती मा.राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे हस्ते पदवी प्रदान
नामदार अजितदादा पवार ,नामदार चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख अतिथी
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या राज्य सार्वजनिक विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. सी.पी.राधाकृष्णन यांचे अध्यक्षतेखाली होत असून या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री व वित्त व नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. नामदार श्री. अजित पवार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कामकाज मंत्री मा. नामदार श्री.चंद्रकांत पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी मा.श्री.चंद्रकात दळवी यांनी दिली. ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के ,रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख , रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे , विभागाचे सहसचिव मा.बी.एन पवार माध्यमिक विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.विजय कुंभार, व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र.संचालक डॉ.हेमंत उमाप, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची स्थापना व वाटचालीचा आढावा घेत असताना कुलाधिकारी चंद्रकात दळवी पुढे म्हणाले की’रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न होते की प्राथमिक,माध्यमिक शाळा व महाविद्यालयात वसतीगृहयुक्त शिक्षण असावे आणि त्यातून विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिका सारख्या योजनाच्या माध्यमातून स्वावलंबी शिक्षण घ्यावे. महात्मा गांधींच्या मूल्य विचाराशी एकनिष्ठ राहणारे ,तसेच देश व परदेशात जाऊन गुणवत्ता मिळवून या देशाच्या उन्नतीसाठी ,समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे पदवीधर त्यांना हवे होते. सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे,काम करत शिकण्याच्या (‘Earn & Learn’) संकल्पनेला प्रोत्साहन देणे, जात-पात, धर्मभेद, लिंगभेद नष्ट करून समाजात समता प्रस्थापित करणे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवणे स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांचे ध्येय होते. गरीब, उपेक्षित आणि शोषित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावणे हे होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते, त्यामुळे त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे हा विचार मांडला.रयत शिक्षण संस्थेच्या तत्वज्ञानानुसार शिक्षण देता यावे.गावखेड्यातील मुलांनाही दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी. स्वतःचे अभ्यासक्रम आणि धोरणे ठरवता यावीत: समाजोपयोगी शिक्षण पद्धती विकसित करता यावी. समान संधी उपलब्ध करून देणे हे ध्येय होते. त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झालेले आहे.
रयत शिक्षण संस्थेने केलेल्या प्रस्तावानुसार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा हे महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थापित केलेले क्लस्टर विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान (RUSA) अंतर्गत केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (MHRD) शिफारशीनुसार स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (Mah. VI of 2017) च्या कलम ३ (६) नुसार या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाने आपले कार्य ३ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू केले.हे विद्यापीठ यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सातारा (YCIS) या महाविद्यालयाच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा (CS) आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (DG) ही महाविद्यालये या विद्यापीठाची घटक महाविद्यालये आहेत. यापूर्वी ही सर्व महाविद्यालये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला संलग्न होती विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे. संशोधनाला प्रोत्साहन देऊन नवीन तंत्रज्ञान आणि ज्ञान विकसित करणे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे.उद्योग आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे कर्मवीरांच्या विचारांशी सुसंगत अशी उद्दिष्ट्ये या विद्यापीठाची आहेत. शैक्षणिक वर्ष २१ -२२,२२-२३ व २३-२४ अशी तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळेच हा प्रथम दीक्षांत समारंभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या समारंभाच्या कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. मा.कुलपती यांचे स्वागत,फोटो सेशन,मिरवणूक, राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत, कुलपती,प्रमुख अतिथी,इतर मान्यवरांचे स्वागत ,दीक्षांत समारंभ सुरु करण्याची विनंती, कुलपती यांची कार्यक्रम सुरु करण्यास मान्यता व उद्घोषणा ,कुलगुरु यांचे वार्षिक अहवाल वाचन ,कुलपतींचा अधिष्ठाता यांना स्नातकांना उपस्थित ठेवण्याचा आदेश, अधिष्ठाता यांची पदवी देण्याविषयी विनंती, पदव्या ,पदविका व प्रमाणपत्रे याबाबत परीक्षा विभाग संचालक यांची घोषणा कुलपती यांचा स्नातकांना उपदेश,पदवी प्रमाणपत्र प्रदान ,कुलाधिकारी यांचे भाषण , प्रमुख अतिथी यांचे मार्गदर्शन ,कुलपती यांचे अध्यक्षीय भाषण,कुलसचिव यांची कुलपती यांना दीक्षांत समारंभ सांगता करण्याची विनंती,दीक्षांत समारंभ संपल्याची घोषणा, शेवटी राष्ट्रगीत अशा स्वरुपाची रचना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष समारंभात कुलपती विद्याशाखानिहाय सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या ३ स्नातकांना पदवी प्रदान करतील. नंतर विषयात सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या इतर ३१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येईल. पदवी परीक्षेत ६७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या अर्जानुसार त्यांना पदवी देण्याची व्यवस्था केलेली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे त्यांनी दिली. शैक्षणिक व्यवस्था चांगली करत पुढे विद्यापीठ कार्यालय इमारतीकडे लक्ष देऊ असेही त्यांनी सांगितले.
या समारंभास महाराष्ट्र शासनाचे विविध खात्यांचे मंत्री, विद्यापीठाचे माजी कुलगुरू,महत्वाचे शासकीय अधिकारी,विद्यापीठाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी,सदस्य,रयतचे पदाधिकारी,मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य,जनरल बॉडी सदस्य,आजीव सदस्य ,आजीव सेवक ,विविध शाखांचे शाखा प्रमुख, पदवी घेणारे स्नातक , इत्यादी उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.
