मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे पोलीस पथकातील श्वानांची निवृत्तीनंतरची तगमग थांबणार निवृत्तीनंतर आता श्वानाला पोलीस दलातच राहता येणार
मुंबई- : श्वान पथक म्हणजे पोलीस दलाचा महत्त्वाचा घटक. गुन्ह्यांचा तपास असो किंवा स्फोटकांचा शोध आणि बचाव मोहिमेत श्वान सगळ्यात पुढे असतो. पण दहा वर्षांनंतर निवृत्त होताच, या श्वानाला पोलीस दल सोडावे लागते. अगदी लहानग्या वयापासून पोलीस दलातील सांभाळ करणाऱ्या रखवालदारापासून अनेकांचा लागलेला लळा सोडवताना या मुक्या शिलेदारांची अवस्था सैरभैर होते. तो क्वचितच निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पालकांकडे रमतो… पण या मुक्या शिलेदारांला आता पोलीस दलातच कायमस्वरूपी राहता येणार आहे. या श्वानाची निवृत्तीनंतरची तगमग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका संवेदनशील निर्णयामुळे थांबणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह विभागाने पोलीस श्वान पथकातील निवृत्त होणाऱ्या या श्वानांच्या या परिस्थितीतबाबत एक अहवाल सादर केला. असा श्वान केवळ ६ ते ९ आठवड्यांचा असताना पोलीस दलात दाखल होतो. या दरम्यान अनेक आव्हानात्मक आघाड्यांवर हा श्वान पोलीस दलाचा वाटाड्या ठरतो. अगदी स्फोटकांना शोधून काढण्यापासून ते गुन्हेगारांचा माग काढण्यात हा श्वान जीवतोड मेहनत करतो. अनेक जोखमीच्या ठिकाणी तसेच अमली आणि नशिले पदार्थ शोधून काढण्यासाठी श्वानांची मदत घेतली जाते. यामुळे कित्येक शोधमोहिमा यशस्वी करण्यात आणि दुर्घटनास्थळी या श्वानांची कर्तबगारी यशस्वी ठरली आहे. अतिरेक्यांना रोखण्यासाठीची जाँबाज कारवाई ते दुर्घटनेतील ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या निष्पापांचा जीवांचा ठावठिकाणा शोधण्यात हे मुके शिलेदार प्रामाणिक आणि अथकपणे कर्तव्य बजावत आहे आहेत.
पण या श्वानांसाठी पोलीस दलातील सेवाकाळ १० वर्षाचा निश्चित करण्यात आला आहे. या काळात प्रशिक्षणासह, त्याच्या देखभालीसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त केले जातात. या रखवालदार पोलीस कर्मचाऱ्यांशी या श्वानांचे जिव्हाळ्याचे भावबंध जुळतात. श्वानाचा दहा वर्षांचा सेवा काळ संपल्यानंतर त्याला सन्मानपूर्वक सक्षम अशा ठिकाणी दत्तक देण्याची कार्यपद्धती अवलंबली जाते. पण अशा पालकांकडे गेल्यावरही या श्वानाने पोलीस दलातील त्याच्या अधिकारी – रखवालदार कर्मचारी यांच्या विरहात अंतिम काळात अन्नत्याग केल्याचे निदर्शनास आले आहे.
या अहवालावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागाला तातडीने निर्देश दिले आहेत. पोलिस दलासाठी अशी दहा वर्षे अथकपणे आणि स्वामिनिष्ठ सेवा दिल्यावर त्याचे असे हाल होणे योग्य नाही. तो श्वान असला तरी त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. अशा श्वानाला निवृत्तीनंतरचे जीवन देखील आनंदात आणि त्याचे कर्तबगारीचा घर असलेल्या पोलीस दलातच घालवता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे आता पोलिस श्वान निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार आहे. त्यामुळे पोलिस विभागातून १० वर्षांची सेवा बजावल्यानंतर हा श्वान निवृत्त होईल. पण, त्याच्या निवृत्तीपश्चात सुद्धा तो पोलिस दलासोबतच राहील अशी तरतूद केली जात आहे. यामुळे त्याच्या रखवालदारासोबत त्याचे असलेले ऋणानुबंध कायम राहतील आणि त्याचे उर्वरित आयुष्य सुखकर होईल. या श्वानाच्या आहारासाठी आणि देखभालीसाठींचा खर्च गृह विभागाला करता येणार आहे
अशा श्वानांनी पोलीस दलासाठी पर्यायाने जनतेच्या हितासाठी दिलेली १० वर्षाची सेवा बजावल्यानंतर त्यांचे उर्वरित आयुष्य केवळ एक ते दिड वर्षच शिल्लक राहते. त्यामुळे अशा श्वानांच्या निवृत्ती पश्चात त्याच्या मृत्यूपर्यंत तसेच या दरम्यान आहार, आरोग्य आणि आवश्यक देखभालीसाठीची आर्थिक तरतूद आता पोलीस दलाकडून करण्यात येणार आहे. निवृत्तीपश्चात श्वान पोलिस दलासोबतच राहिल्याने त्याचे उर्वरित आयुष्य सुखकर होणार आहे. त्याचे रखवालदारासोबतचे ऋणानुबंध कायम राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे पोलीस दलाचा अविभाज्य घटक असलेल्या श्वान पथकांतील या मुक्या शूर शिलेदारांच्या उर्वरित आयुष्याची योग्य आणि सन्मानाजनक काळजी घेतली जाईल, असे नमूद करून प्राणीप्रेमी आणि श्वान प्रेमींनी या संवेदनशील निर्णयाचे स्वागत केले आहे.





