क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे यज्ञकुंड –इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे
पुणे येथे क्रांतिसप्ताह व्याख्यानमाला
पुणे : क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संपूर्ण आयुष्य संघर्षासाठी समर्पित केले. स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात आपल्या अखंड आयुष्याची आहुती देत त्यांनी इंग्रज सत्तेविरोधात अखेरपर्यंत लढा दिला. अनेक वर्षे भूमिगत राहून ब्रिटिश सत्तेला आव्हान देतानाच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचा यज्ञकुंड होते, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी केले.
पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयात आयोजित क्रांतिसप्ताह व्याख्यानमालेत ‘क्रांतिसिंहांची जीवनगाथा’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अल्पना वरपे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी शामकांत देशमुख, तसेच माणिकराव साळुंके, सतीश लिंबेकर, रणजित हगवणे, विठ्ठल मोहोळ, मुख्याध्यापिका शारदा साबळे, सीमा मस्के, हेमलता थोरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
ननावरे म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्याचा लढा केवळ ब्रिटिशांविरोधातील संघर्ष म्हणून पाहिला नाही, तर तो सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाच्या हक्काचा लढा बनविला. प्रतिसरकारच्या माध्यमातून ग्रामव्यवस्था सक्षम करणे, लोकांच्या समस्या सोडविणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि सावकारी पाशातून शेतकरी व सामान्य जनतेची सुटका करणे, यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले.
ब्रिटिश राजवटीच्या दडपशाहीला न जुमानता त्यांनी जनतेमध्ये स्वराज्याची भावना रुजवली. गावोगावी संघटन उभी करून लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या कार्यातून स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नसून सामान्य माणसाला न्याय, स्वाभिमान आणि सुरक्षित जीवन मिळणे हीदेखील स्वातंत्र्याची व्यापक संकल्पना असल्याचे स्पष्ट होते, असे ननावरे यांनी सांगितले.
क्रांतिसिंहांच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे भूमिगत कार्य, प्रतिसरकारची निर्मिती आणि जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेला त्याग यांचा आढावा घेत ननावरे यांनी त्यांच्या कार्याचे आजच्या पिढीने स्मरण करण्याची गरज व्यक्त केली. क्रांतिसिंहांचे विचार आणि कार्य हे समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, इतिहासप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.





