माणुसकीचा पाझर मनुष्यबळा अभावी पडून राहिलेल्या जमिनीत गावकऱ्यांनी केली भात लावणी
केडंबे येथील शेतकऱ्यांच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक
केळघर :आजच्या काळात शेतीतील वाढता खर्च आणि शेतीसाठी मनुष्यबळाची भासणारी तीव्र टंचाई यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे निदर्शनास येत आहे. केडंबे गावातील शेतकरी आनंदा धोंडीबा ओंबळे या शेतकऱ्याच्या भात शेतीची लावणी मनुष्यबळ अभावी रखडली होती. भाताच्या लावणीसाठी मजूर मिळत नसल्याने ते चिंतातुर झाले होते. मात्र गावांतील ग्रामस्थांनी एकी हीच खरी ताकद या उक्तीचा प्रत्यय देत गावचे सरपंच महादेव ओंबळे, शिवसेना सातारा जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांच्यासह गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आनंदा ओंबळे यांची रखडलेली भात लावणी पूर्ण करून दिली. केडंबे येथील शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधीलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
केडंबे येथील शेतकरी आनंदा ओंबळे यांनी भात लागण करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. मात्र भात लागणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आनंदा ओंबळे यांना लावणीसाठी मजूर उपलब्ध होत नव्हते. मजूर उपलब्ध न झाल्याने त्यांची भात शेती पडून राहण्याची भीती होती. ही परिस्थिती गावचे सरपंच महादेव ओंबळे व शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांना समजली. त्यानंतर त्यांनी गावांतील शेतकऱ्यांना एकत्र करून आनंदा ओंबळे यांच्या शेतावर जाऊन भात लागण पूर्ण केली सरपंच महादेव ओंबळे यांनी गावातील इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या शेतकऱ्याची भात लागण मोफत करून देवून माणुसकीचे दर्शन घडविले. खरंतर हल्लीच्या जमान्यात कोण कोणाच्या उपयोगी पडत नाही परंतु सर्वांनी आदर्श घ्यावा असे काम केडंबे गावातील सरपंच महादेव ओंबळे, आदिनाथ ओंबळे, बाजीराव ओंबळे,बाळकृष्ण ओंबळे ,कोंडीबा भिलारे, शंकर ओंबळे, एकनाथ ओंबळे, किरण ओंबळे यांनी केले.
भात लागण पूर्ण झाल्यानंतर आनंदा ओंबळे यांनी मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले. मजूर न मिळाल्याने भात शेती पडून राहते काय अशी भीती वाटत होती. पण गावांतील शेतकऱ्यांनी भावासारखी मदत करून माझी चिंता दूर केली अशा शब्दांत आपल्या भावना आनंदा ओंबळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
कोट:आजच्या भौतिकवादी जगात जिथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत केडंबे गावांतील शेतकऱ्यांनी दाखवून दिलेली सामाजिक बांधिलकी आणि परस्परांना मदत करण्याची वृत्ती समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरणार आहे.केडंबे गावाला एकीची परंपरा असून गावाने एकीच्या जोरावर विविध शासकीय योजनांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून यापुढेही ग्रामस्थांच्या एकीच्या जोरावर गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार आहे:एकनाथ ओंबळे:शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख
-गावकऱ्यांचा सामूहिक पुढाकार
आज रविवारी सकाळी गावातील सरपंच, शेतकरी यांनी एकत्रितपणे आनंदा ओंबळे यांच्या शेतीत जाऊन भातलावणी सुरू केली.
उपस्थित शेतकऱ्यांनी आपापसात कामे वाटून घेऊन काही तासांतच भात लावणी पूर्ण केली.
वेळेत लावणी पूर्ण झाल्यामुळे आनंदा ओंबळे यांच्यावरील मोठे संकट टळले असून त्यांना मोठा आर्थिक व मानसिक दिलासा मिळाला आहे.





