गोगवे शासकीय आश्रमशाळेत पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचा ‘सुरक्षा व सायबर क्राईम’विषयक विशेष संवाद !
महाबळेश्वर -विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात ते सायबर गुन्ह्यांचे बळी ठरू नयेत, या उद्देशाने महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी गोगवे येथील शासकीय आश्रमशाळेस सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देत सायबर क्राईमबाबत अत्यंत मोलाचे व योग्य मार्गदर्शन केले.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी दैनंदिन जीवनातील वैयक्तिक सुरक्षा, अनोळखी व्यक्तींपासून सावधानता आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी कसा संपर्क साधावा, याविषयी अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. त्याचप्रमाणे, सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरामुळे घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत (Cyber Crime) त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर धडे दिले. “सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, अनोळखी लिंक्स किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काय करावे,” याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सतर्क राहण्याचे आवाहन केले.
या जनजागृतीपर कार्यक्रमादरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला व आपल्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि महाबळेश्वर पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी आणि त्यांना जागरूक नागरिक बनवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.





