अण्णाभाऊ साठे हे समाजचिंतक साहित्यिक; सहा. प्रा. सूर्यकांत अदाटे यांचे प्रतिपादन
सातारा -१ ऑगस्ट, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने “लेखन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय अण्णाभाऊंच्या कार्याची घेतलेली खरी दखल आहे. अण्णाभाऊ हे केवळ लोकशाहीर नसून भारतीय सामाजिक संरचनेचे सखोल विश्लेषक, समाजचिंतक साहित्यिक आहेत. असे प्रतिपादन सहा. प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘लेखन प्रेरणा दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक शेलार यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले, जगण्यासाठी लढणारी माणसं त्यांनी आपल्या साहित्यातून उभी केली आहेत. आपल्या वैविध्यपूर्ण व वैशिष्टयपूर्ण लेखनाने अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. उत्तम आळतेकर म्हणाले उत्कृष्ट कथानक,जिवंत व्यक्तीरेखा, चांगली वातावरण निर्मिती, उत्तम निवेदनशैली व ग्रामीण बोली भाषेच्या वापरामुळे अण्णाभाऊंच्या कथा – कादंब-या चित्ताकर्षक ठरतात. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील त्यांचे योगदान संस्मरणीय आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाला यावेळी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. देवेंद्र कदम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





