महाबळेश्वर–तापोळा मुख्य महामार्ग खचला: पर्यायी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु; १०५ गावांतील नागरिकांनी संयम बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
महाबळेश्वर प्रतिनिधी (राजेश सोंडकर ):महाबळेश्वर तालुक्यात २६ जुलै २०२६ पासून सुरु असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तब्बल १०५ गावांची जीवनवाहिनी मानला जाणारा ‘महाबळेश्वर–तापोळा’ हा प्रमुख महामार्ग मोठ्या प्रमाणावर खचला आहे. यामुळे तापोळा खोऱ्यातील १०५ गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन, वन विभाग, नगरपालिका प्रशासन व १०५ गाव नियोजन समिती यांची संयुक्त बैठक पार पडली असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम वेगाने सुरु करण्यात आले आहे.
संयुक्त बैठकीत महत्त्वाचे निर्णय
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आज दुपारी पार पडलेल्या या बैठकीत रस्ता दररोज खचत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. यावर उपाय म्हणून तातडीने एक पर्यायी मार्ग तयार करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय यंत्रणांनी वेळ न दवडता या पर्यायी मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरु केले असून, बंद पडलेला संपर्क पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वाच्या बैठकीस सातारा जिल्हा परिषद सदस्य अजीतदादा सपकाळ, पंचायत समिती उपसभापती संजयभाई मोरे, सातारा जिल्हा युवासेना जिल्हाध्यक्ष विशालभाऊ सपकाळ, संविधान प्रचारक उत्तम भालेराव, तसेच गणेश सपकाळ, सुभाष कारंडे, संपत जाधव, राम सपकाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि १०५ गाव नियोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर
महाबळेश्वर–तापोळा या महत्त्वाच्या दळणवळण मार्गावरील माखारिया हायस्कूल ते कारवी आळा या दरम्यान नवीन रस्त्याची उभारणी करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आधीच मंजूर झाला आहे. हे विकासकाम लवकरच प्रत्यक्ष सुरु होणार असून भविष्यात या तापोळा खोऱ्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, मजबूत आणि सक्षम रस्ता उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
संविधानात्मक अधिकार आणि प्रशासकीय कर्तव्य
संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित प्रवास आणि मूलभूत सुविधांचा अधिकार दिला आहे. याच भावनेतून प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते एकमेकांच्या समन्वयाने कार्यरत आहेत. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हेच आपले सर्वोच्च कर्तव्य मानून सर्व शासकीय यंत्रणा या आपत्कालीन परिस्थितीत रात्रं-दिवस काम करत आहेत.

नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
१०५ गावांतील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून संयुक्तपणे विनंती करण्यात आली आहे की:
सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.
अत्यंत आवश्यक आणि तातडीच्या कामासाठीच प्रवास करावा.
पर्यायी मार्ग लवकरात लवकर तयार करुन वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु केली जात असल्याने जनतेने धीर, संयम आणि सहकार्य बाळगावे.




