सातारा जिल्ह्यात 53,736 शेतकऱ्यांना 569 कोटींची कर्जमाफी; 2 लाख शेतकऱ्यांची 1,068 कोटींची वीज थकबाकीही माफ
सातारा (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील 53 हजार 736 खातेदार शेतकऱ्यांना 569 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून ही रक्कम थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे वितरित केली जाणार आहे. तसेच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांची वीज थकबाकी माफ करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना 1,068 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
ही माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम व विकास गोसावी उपस्थित होते.
रविंद्र चव्हाण म्हणाले राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधील काही अटी शिथिल करून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पूर्वीच्या योजनेतील 50 हजार रुपयांची मर्यादा आणि नियमित कर्जफेडीची अटही रद्द करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणाऱ्या विविध घोषणांसह 7.5 एचपीपर्यंतच्या कृषी वीजपंपांची सुमारे 48 हजार कोटी रुपयांची जुनी वीज थकबाकी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचा दावा करण्यात आला.
राज्य सरकार शेतीसाठी दरवर्षी सुमारे 95 हजार कोटी रुपयांचा खर्च करत असून, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सौर कृषीवाहिनी, सौरपंप आणि नदीजोड प्रकल्पांसारख्या योजनांद्वारे शेती अधिक शाश्वत व सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पुढील काळात दिवसा वीजपुरवठा शंभर टक्के करण्याबरोबरच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.





