वारीतील वारकऱ्यांच्या सेवेत ‘उत्कर्ष’चा सहभाग
लोणंद: आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे दाखल झाली असता, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांना उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. भक्तिभाव, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमास वारकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नसून, भक्ती, समता, बंधुभाव आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे संस्थेसाठी अत्यंत भाग्याचे आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सेवाभावी उपक्रमास संस्थेचे संचालक श्री. मदन साळवेकर सर, डॉ. श्रीमती मंगल अहिवळे, श्रीमती नीला कुलकर्णी, श्रीमती अलका घाडगे तसेच सौ. प्रीति कोल्हापुरे, सौ. स्नेहा फुले, सौ. प्रणाली शिंदे तसेच संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. प्रकाश पवार आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई ही आर्थिक सेवांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरांशी असलेली आपली बांधिलकी सातत्याने जपत असून, समाजातील विविध घटकांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबवित आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.





