MPSC परीक्षांमध्ये संगणकाधारित पद्धती ऑगस्ट 2027 पासून; तोपर्यंत जुन्याच पद्धतीने परीक्षा
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये संगणकाधारित पद्धती लागू करण्याचा निर्णय ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तोपर्यंत सर्व परीक्षा विद्यमान पारंपरिक पद्धतीनेच घेण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुंबई येथे बैठक घेतली.
बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, सुरक्षित आणि पारदर्शक निवड प्रक्रिया हा शासनाचा कायमचा आग्रह असून परीक्षापद्धतीही तितकीच पारदर्शक असली पाहिजे. परीक्षा आणि निकाल वेळेत लागणे आवश्यक आहे. मात्र, एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे संक्रमण करताना सर्व यंत्रणांना तसेच विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे.
त्यामुळे संगणकाधारित परीक्षा तातडीने लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळेल आणि परीक्षा यंत्रणाही पूर्णपणे सज्ज होईल, असे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत आयोगाच्या कामकाजाची प्रशंसाही केली.





