दारू पार्टीतील किरकोळ वादातून युवकाचा खून; चौघांना अटक
पाचगणी प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे दारू पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर (जि. पुणे) येथील अक्षय रमेश जाधव (वय २५) हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे आला होता. बुधवारी (दि. ८) रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल अँड लॉजमध्ये दारू पार्टी सुरू असताना काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, अक्षय जाधव याच्यावर लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अक्षय जाधव याला प्रथम पाचगणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वाई आणि नंतर बारामती येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी विशाल अजित जाधव (वय ३०, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचगणी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१) सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर)२) अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई)३) राहुल जनार्दन राजपुरे (रा. कणूर, ता. वाई)४) अमोल गोपाळ वाडकर (रा. खिवली, ता. वाई)
या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास सपोनि डी. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस करीत आहेत.





