पाणीटंचाईच्या संकटात सातारा सुरक्षित; खा. श्री. छ.उदयनराजेंच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची प्रचिती
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सातारकरांना पाणीटंचाईची झळ कमी
कास धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे सातारकरांना दिलासा; आणखी सहा महिने पुरेल इतके पाणी उपलब्ध
सातारा(अली मुजावर ): राज्यातील अनेक भागांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असताना सातारा शहर आणि परिसरातील नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. कास धरणामध्ये सध्या आणखी सुमारे सहा महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही तातडीची चिंता नसल्याचे चित्र आहे.
यामागे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा मोठा वाटा असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी कास धरणाची उंची वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ झाली आणि भविष्यातील पाणी गरजांचा विचार करून मजबूत नियोजन करण्यात आले.
आज त्याच निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. जून महिना संपत आला असतानाही सातारा शहरात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. उलट कास धरणातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना आणि विविध जनहिताच्या प्रकल्पांवर सातत्याने भर देण्यात आला आहे. दीर्घकालीन नियोजन आणि लोकहिताच्या निर्णयांमुळे जिल्ह्याचा विकासाचा वेग कायम राहिला असून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत झाली आहे.
पाणीप्रश्नासारख्या संवेदनशील विषयावर वेळेत घेतलेले निर्णय आणि दूरदृष्टीने केलेले नियोजन यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विकासकामांची चर्चा पुन्हा एकदा जिल्हाभर होत आहे.




