पशुधन वाचवण्यासाठी जिल्ह्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत-श्रीरंग काटेकर
तीव्र उन्हाळा व पाणीटंचाईने शेतकरी वर्ग त्रस्त.
सातारा – पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजापुढे जीवापाड जपलेल्या पशुधनाचा जीव वाचवणे हे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. उभी पिके डोळ्यादेखत करपून जात असताना आता त्यात पशुधनाची समस्या उभी राहिली आहे. जूनचा निम्मा महिना संपत आला तरी वरुणराजाने कृपा झाली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेती व्यवसायाला पूरक ठरणाऱ्या व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पशुधन व्यवसाय पाण्यामुळे व हिरव्या चाऱ्याविना अडचणीत आला आहे. पशुधनाची डोळ्यादेखत होत असलेले दयनीय स्थिती पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग सैरभैर झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. पशुधनाच्या बाबत शेतकरी वर्ग व्याकुळ झाला असून तो पावसाच्या पावसाच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक भागात तीव्र उन्हाळा व पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची झळ आता जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांबरोबरच जिवापाड जपलेल्या जनावरांनाही बसत आहे. गाई म्हैस बैल शेळ्या मेंढ्या कोंबड्या यांना चारापाणी मिळत नसल्याने पशुधनाचे करायचे काय असा प्रश्न शेतकरी बांधवांकडे पडला आहे. विशेषता जिल्ह्यातील खटाव,माण,दहिवडी,कोरेगाव, म्हसवड ,
फलटण,खंडाळा बरोबरच जावली व परळी भागातील शेतकरी बांधवांकडे प्रश्न उभा राहिला आहे. शेतकरी बांधव शासनाच्या मदतीच्या अपेक्षित आहेत. सध्या चारा पाण्याविना जनावरांचे हाल होत असून शेतकरी बांधव या समस्ये पुढे हातबल झाला आहे. असंख्य जनावरे हे चारापाणी विना होरपळून जात असून. कित्येक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, दहिवडी हे कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो. उन्हाळ्यात येथील पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. जीवापाड जपलेली हे पशुधन जगवणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान असते. निसर्गाच्या वारंवार होणाऱ्या कोपामुळे येथील शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत असते. जमीन आहे पण पाणी नाही अशा विचित्र परिस्थितीत ही शेतकरी बांधव मात्र आशेवर जगत आहेत. मागील चार-पाच वर्षापासून सतत तीव्र उन्हाळ्यामुळे भूजलातील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. ओढे नाले तलाव कोरडे पडल्याने या भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
खटाव,माण,दहिवडी,म्हसवड,फलटण सह खंडाळा भागातील असंख्य शेतकऱ्यांकडे पशुधन वाचवणे यासाठी धडपड करावी लागते. जनावरांना चारापाणी प्राप्तीसाठी कोसो मैल भटकंती शेतकऱ्यांना करावी लागते. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जनावरांना हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. राजकीय मंडळींकडून याबाबत ठोस भूमिकेची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने शेतकऱ्यांकडे पशुधनाचे करायचे काय हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या समस्या बरोबरच पशुधनाची समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे अपेक्षित असताना राजकीय मंडळी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी वर्गांमधून बोलले जात आहे.
.. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुधनाकडे पाहिले जाते. सध्या शेती व्यवसाय हा अडचणीत आला असून शेतीमधील पिकांना बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग सध्या कोमात गेला आहे. तीव्र उन्हाळा व दुष्काळाची त्यात भर पडली आहे. ओला व सुका दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी वर्ग नेहमीच अडचणीला सामोरे जात असतो. त्यात जीवापाड जपलेल्या पशुधनाचा प्रश्न त्यांच्यापुढे एक आव्हान म्हणून उभे राहत असते. शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना बरोबरच पशुधनाच्या वेदना व्यथा लोकप्रतिनिधींनी समजून घेणे गरजेचे वाटते.
श्रीरंग काटेकर सातारा




