कृषि विभागाची मोठी कारवाई : ८ खत विक्री परवाने निलंबित
खरीप हंगाम २०२६-२७ आधीच अनियमिततेवर लगाम; शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक पावले
सातारा दिनांक २९- खरीप हंगाम २०२६-२०२७च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांवर कृषि विभागाने मोठी कारवाई करत ८ खत विक्री परवाने निलंबित केले आहेत. युरिया व इतर खतांच्या विक्रीत गंभीर अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा घालण्याचा प्रशासनाचा स्पष्ट संदेश यामधून दिला गेला आहे.
जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथकांनी केलेल्या अचानक तपासणीत अनेक विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले. काही ठिकाणी खत विक्रीसाठी POS मशीनचा वापरच केला जात नव्हता, तर काही विक्रेत्यांकडे मशीनवरील साठा, प्रत्यक्ष साठा आणि नोंदवहीतील आकडे जुळत नव्हते. तसेच शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे यासारख्या गंभीर बाबी देखील समोर आल्या.
प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दरात खते व बियाणे मिळावीत आणि त्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाभरात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. एप्रिल महिन्यातील तपासणीत दोषी आढळलेल्या १० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी ८ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके खते, बियाणे व किटकनाशक विक्री केंद्रांची अचानक तपासणी करत राहणार आहेत. खरीप हंगामात कोणताही गैरप्रकार सहन केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शेतकऱ्यांनी खते, बियाणे व औषधे खरेदी करताना नामांकित कंपनीचा आग्रह धरावा पक्के बिल अवश्य घ्यावे, कोणतीही शंका किंवा फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवावी. तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून
शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी पंचायत समिती व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवही ठेवण्यात आली आहे. तसेच थेट तक्रार नोंदवण्यासाठी खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करावी.
9822664455, 7498921284असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.




