आंबेनळी घाट पुन्हा रक्तरंजित; दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार
महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर दुचाकी घसरून दाम्पत्य सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना कुंभरोशी गावाजवळ गुरुवारी घडली.
पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, स्प्लेंडर दुचाकी बॅरिकेटमध्ये अडकलेली आढळली. शोधमोहीम राबविल्यानंतर दरीत दोघांचे मृतदेह सापडले. मोहन चव्हाण (वय ५५) व जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगीरवाडी) अशी मृतांची ओळख पटली.
अवकाळी पाऊस व दाट धुके यामुळे बचावकार्याला अडथळे निर्माण झाले. प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स व पोलीस यांनी संयुक्तरीत्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले.
आंबेनळी घाटातील तीव्र वळणे व घसरडे रस्ते यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आंबेनळी घाट हा अतिशय वळणांचा असल्यामुळे या ठिकाणी प्रवास करताना गाडीची वेग मर्यादा कमी ठेवणे आवश्यक असल्याने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी याच घाटामध्ये एसटी बस अपघातग्रस्त झाल्याने अनेक प्रवाशांचा जीव गेला होता.




