इंग्लंडला नमवत भारत सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!
भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या मैदानावर दोन्ही डावात मोठी धावसंख्या होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विक्रमी २५४ धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विल जॅक्सने पूर्ण जोर लावला. पण भारतीय संघाने हा सामना ७ धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. फिल सॉल्ट अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. जोस बटलरने काही आकर्षक फटके मारले. पण तो २५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुकही अवघ्या ७ धावांवर बाद झाला. टॉम बँटम १७ धावांवर माघारी परतला. शेवटी जेकब बेथल आणि विल जॅक्सने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवलं. विल जॅक्स ३५ धावा करून माघारी परतला. पण बेथलने दमदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. पण इंग्लंडचा थोडक्यात पराभव झाला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाला प्रथम फलंदाजीच हवी होती. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. अभिषेक शर्मा या डावात अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनच्या जोडीने मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून ९६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान संजू सॅमसनने ८९ धावांची भागीदारी केली. तर इशान किशनने ३९ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने ४३ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव ११ धावांवर माघारी परतला. तर हार्दिक पांड्याने २७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २१ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ७ गडी बाद २५३ धावांवर पोहोचवली.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये
भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे.




