ब्ल्यू एनर्जी मोटर्स यांच्या ईव्ही ट्रकचे उदघाटन… माल वाहतूक क्षेत्रात क्रांती !
पुणे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चाकण, पुणे येथे ब्लू एनर्जी मोटर्सच्या ईव्ही ट्रकचे उदघाटन केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मालवाहतूक क्षेत्रातील ही ईव्ही क्रांती अत्यंत महत्त्वाची आहे. सार्वजनिक वाहतुकीव्यतिरिक्त सर्वाधिक कार्बन उत्सर्जन हे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे होते. ईव्ही ट्रकच्या वापरामुळे हे उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल, आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने टाकलेले हे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ब्ल्यू एनर्जी मोटर्सने कार्गो वाहतुकीसाठी मेड इन इंडिया ट्रक विकसित करून एक नवा मानक स्थापित केला आहे. दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारानंतर कंपनीने अत्यंत वेगाने प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण केले.
इलेक्ट्रिक ट्रकसाठी तयार करण्यात आलेले बॅटरी त्वरित बदलण्याचे (बॅटरी स्वॅपिंग) तंत्रज्ञान हे ईव्ही क्षेत्रातील मोठी क्रांती ठरणार असून बॅटरीच्या क्षमतेत वाढ व किमतीत घट होत असल्याने येत्या काळात ट्रक 400 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतील, अशी माहितीही त्यांनी दिली. हा केवळ एक ट्रक नसून ‘स्मार्ट टेक्नॉलॉजी’चे उदाहरण आहे. माल वाहतुकीतील हा ‘टेस्ला मोमेंट’ आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
या तंत्रज्ञानामुळे अपघात कमी होण्यासोबत वाहतूक नियम पाळण्यासही मदत होईल. डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या या ट्रकच्या किफायतशीर किंमतीमुळे या वाहनांना बाजारात उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने ईव्ही क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले असून पर्यावरणाचे रक्षण व उद्योगाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकार मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरसाठी ब्ल्यू एनर्जी मोटर्ससोबत काम करणार आहे. यासोबतच राज्यात सौर ऊर्जा निर्मितीला गती देण्यात येत असून, 2035 पर्यंत 75 ते 80% ऊर्जेचा वापर नवीकरणीय ऊर्जा स्रोताद्वारे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.यावेळी ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे अधिकारी उपस्थित होते.




