राज्यातील गटसचिव संघटनेचे कराडच्या प्रीतीसंगमावर भर पावसात आंदोलन; नेमक्या मागण्या काय?
कराड प्रतिनिधी । राज्यातील साडेआठ हजार गटसचिव कर्मचाऱ्यांचे 110 महिन्यापासून थकीत वेतन मिळावे. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी शासन दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळाभोवती विदर्भ, मराठवाड्यातील गट सचिवांनी आज धरणे आंदोलनं केले. यावेळी गट सचिवांनी थकीत वेतनाची महत्वाची मागणी सरकारकडे केली.
राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून चर्चा केली जात असताना राज्यातील गट सचिव कर्मचाऱ्यांनी आज सातारा जिल्ह्यतील कराड येथील प्रीतिसंगमावर धरणे आंदोलनं केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आपल्या प्रलंबित वेतनासह इतर मागण्या देखील पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी गट सचिव कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.

यावेळी कर्माचारी म्हणाले की, आमच्या महत्वाच्या अशा चार मागण्या आहेत. त्यामध्ये सेवा सहकारी संस्थेवर कार्यरत गट सचिवांच्या थकीत व नियमित वेतनासाठी तत्काळ निधी मंजूर करावा, गट सचिवांना ग्रामसेवकांसमान अद्ययावत वेतन श्रेणी लागू करावी, सेवा सहकारी संस्थेचे मागील पाच वर्षांपासूनचे थकीत देय असणारे सक्षमीकरण अनुदान तत्काळ अदा करावे, संस्था नियुक्त सचिवांचे सेवा नियम व वेतन निश्चित करून समायोजन करावे,आदी महत्वाच्या चारा मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या गट सचिवांनी केली.




