छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव, 100 हून दुकानं जळून खाक; नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर येथील आझाद चौकात भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत फर्निचरची 100 हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत. यामुळे व्यापारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आग इतकी भयंकर होती की क्षणार्धात ज्वाळांनी उग्र रूप धारण केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आझाद चौक परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये अचानक आग लागली. दुकानांमध्ये लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग झपाट्याने पसरली. काही वेळातच संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांनी वेढला. ही आग इतकी मोठी होती की तिचा धूर दूरवरून दिसत होता.
या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल वेगाने दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.अनेक बंब घटनास्थळी कार्यरत असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
