कृषिमंत्री कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, विवाह करत फिरता
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करावयाचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता, असे धक्कादायक विधान कोकाटे यांनी केले आहे.अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कोकाटे यांनी पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा प्रश्न विचारला असता त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. कोकाटे यांच्या या विधानावर शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे.कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता, कर्जमाफी दिल्यावर एक रुपयाची तरी शेतात गुंतवणूक केली का, सरकार आता शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे. शेतीच्या पाईपलाइनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात. सरकार भांडवली गुंतवणूक देते. शेतकरी या पैशांचा त्याच कामासाठी उपयोग करतो का, शेतकरी म्हणतो कर्जमाफी पाहिजे, विम्याचे पैसे पाहिजे आणि करतात काय, तर साखरपुडा आणि लग्न करा. या पैशांचा शेतीला काही उपयोग केला का, असा प्रश्न कोकाटे यांनी विचारला.
