सातारा -कोयनानगर व परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणात तब्बल ३ टीएमसीने साठा वाढ झाली असून, धरणातील एकूण साठा 25.12 टीएमसी (23.87%) आणि जिवंत साठा 20.00 टीएमसी (19.97%) इतका झाला आहे.
आज सकाळी ८ वाजता धरणाची पाणीपातळी 2066 फूट 09 इंच (629.945 मीटर) इतकी नोंदवण्यात आली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची नोंद झाली असून, पावसाचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत:
कोयना : 137 मिमी (एकूण: 388 मिमी)नवजा: 125 मिमी (एकूण: 366 मिमी)महाबळेश्वर: 128 मिमी (एकूण: 324 मिमी)
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही दिवसांत धरणातून विसर्गाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
