मुंबई इंडियन्सने मिळवला दणदणीत विजय
मुंबई-आयपीएल 2026 मधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवत हंगामाची विजयी सुरुवात केली. तब्बल 13 वर्षांनंतर मुंबईने स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकत चाहत्यांना मोठी भेट दिली.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने दमदार खेळ करत 4 विकेट्स गमावत 220 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. मोठं लक्ष्य उभं राहिल्यानंतर मुंबईवर दबाव असणार असं वाटत होतं, पण रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करत सगळं चित्रच बदलून टाकलं. 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपला पहिला सामना जिंकण्याचा पराक्रम केला.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो चांगलाच महागात पाडला. सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे आणि फिन अॅलन यांनी केकेआरला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांसारख्या आघाडीच्या गोलंदाजांनाही त्यांनी सोडले नाही. मात्र, ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. फिन अॅलनने 17 चेंडूत 37 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर आलेल्या कॅमेरून ग्रीननेही थोडा प्रतिकार केला, पण शार्दुल ठाकूरने त्यालाही 18 धावांवर बाद करत केकेआरला दुसरा धक्का दिला. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सांभाळत आक्रमक फलंदाजी केली. त्याने 40 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. रहाणेचा फॉर्म पाहता तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत मुंबईला महत्त्वाचे यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूला अंगकृष रघुवंशीनेही तितक्याच आक्रमक शैलीत फलंदाजी करत 29 चेंडूत 51 धावा ठोकल्या. अखेरीस रिंकू सिंगने 21 चेंडूत नाबाद 33 धावा करत संघाचा स्कोअर 220 पर्यंत पोहोचवला. मुंबईकडून शार्दुल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 विकेट घेत केकेआरच्या फलंदाजांना आवर घालण्याचा प्रयत्न केला, तर कर्णधार हार्दिक पांड्याला 1 विकेट मिळाली.
221 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 78 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव 8 चेंडूंत तीन चौकारांसह 16 धावांवर बाद झाला. रिकेल्टनने मुंबईसाठी 43 चेंडूंत 81 धावांची सर्वात मोठी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आठ षटकार आणि चार चौकार मारले. हार्दिक पांड्या 18 धावांवर आणि नमन धीर 5 धावांवर नाबाद राहिले. अशाप्रकारे, मुंबई इंडियन्सने चार गडी गमावून लक्ष्य गाठले आणि सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्ससाठी हा विजय अत्यंत खास आहे. 2012 नंतर मुंबईला एकदाही आयपीएलमधील आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता. सलग 13 हंगाम सलामीचा सामना हरण्याचा नकोसा विक्रम मुंबईच्या नावावर होता. मात्र, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने हा ‘कलंक’ पुसून काढला आणि विजयाचा गुलाल उधळला.




